pandurang sugar factory meeting
pandurang sugar factory meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पांडुरंग कारखान्याला सुधाकरपंत परिचारक यांचे नाव : वार्षिक सभेत सभासदांची बहुमताने मंजुरी

सरकारनामा ब्यूरो

श्रीपूर (जि. सोलापूर) : श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा (Sugar Factory) नाम विस्तार करण्यास सभासदांनी आज (ता. २९ सप्टेंबर) दोन्ही हात उंचावून समर्थन दिले. त्यामुळे पांडुरंग कारखान्याचे नाव आता ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक (Sudhakarpant paricharak) श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना’ श्रीपूर असे असणार आहे. त्यामुळे सहकारातील डॉक्टर अशी ओळख असलेल्या परिचारक यांचे नाव आता सहकाराशी कायमस्वरूपी जोडले जाणार आहे. (Name of Sudhakarpant paricharak to Pandurang Sugar Factory)

श्री पांडुरंग कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. २९ सप्टेंबर) पार पडली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, उमेश परिचारक, हरीश गायकवाड, दाजी पाटील यांच्यासह आजी-माजी संचालक उपस्थित होते.

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व विषय वाचन केले. सभासदांच्या आग्रहाखातर कारखान्याच्या नावात बदल करण्याचा ठराव त्यांनी मांडला. त्यास सभासदांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. सभागृहात उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी उभे राहून दोन्ही हात उंचावून या ठरावाचे स्वागत केले. या वेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक आणि कार्यकारी संचालक डॉ. कुलकर्णी यांनी समर्पक उत्तरे दिली.

परिचारक म्हणाले की, सुधाकरपंत परिचारक यांच्या आदर्श तत्व प्रणालीला अनुसरून पांडुरंग कारखान्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे, लेखापरीक्षणात कारखान्याला ९३ टक्के गुण मिळाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पांडुरंगचा सन्मान झाला आहे. राजकारणापेक्षा शेतकऱ्यांशी बांधिलकी मानून सुधाकरपंतांनी आयुष्यभर कृती केली. त्यांच्याच मार्गावर आम्ही देखील काम करतोय. पुढील हंगामात कारखान्याची गाळपक्षमता दहा हजार टन होणार आहे. असे त्यांनी नमूद केले.

पांडुरंग कारखान्याची आर्थिक परिस्थिती संपत्ती स्थिती उत्तम असल्याचे सांगितले. इतर कारखान्यांच्या आणि पांडुरंगाच्या वार्षिक अहवालाची सभासदांनी तुलना करून बघावी, असे आवाहन करून पारिचारक म्हणाले की, लेखापरीक्षणात पांडुरंग कारखान्याला सतत 'अ' वर्ग मिळाला आहे 'अ' वर्गासाठी २०० पैकी १६१ गुण प्राप्त होणे आवश्यक असते. परंतु, पांडुरंगला १८६ गुण मिळाले आहेत. कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी या सर्वांचे त्यात योगदान आहे. आपल्या सगळ्यांच्या योगदानामुळेच आज पांडुरंग कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT