Solapur, 15 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गेली दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा उत्तर सोलापूरचे ज्येष्ठ नेते बळिराम काका साठे यांनाही स्थान देण्यात आले नाही, त्यामुळे नाराज झालेल्या साठेंनी मोठा निर्णय घेतला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्याचा राजकारणात एकमेकांना नेहमी साथ देणारे दिलीप माने यांच्या गोटातून काका साठे यांना एक जागा सुटेल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. मात्र, तो सपेशल खोटा ठरला असून भाजप-काँग्रेस नेत्यांच्या पॅनेलमधून साठे यांना डावलण्यात आले आहे, त्याची चर्चा कालपासून सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून होत आहे. माने आणि कल्याणशेट्टी यांनी डावलल्यानंतर बळीराम साठे (Baliram Sathe) यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत माघार घेण्याची घोषणा केली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे म्हणाले, मी स्वतः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेणार आहे. मात्र, भाजपचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्यास त्यांच्या भूमिकेला माझा बिनशर्त पाठिंबा असणार आहे. त्यांनी तयारी दर्शविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन ते चार कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची आमची तयारी आहे.
दरम्यान, बळीराम साठे यांच्या भूमिकेमुळे भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठे बळ मिळणार आहे. कारण उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर साठे यांचे वर्चस्व आहे. काही सोसायट्यांमध्येही त्यांचे समर्थक आहेत. याशिवाय सीना पट्ट्यातही काका साठेंना मानणारे प्रबळ कार्यकर्ते आहेत. दक्षिण सोलापूरमध्येही साठेंच्या जवळचे काही लोक आहेत, त्यामुळे साठेंची ताकद नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
भाजप आमदार सुभाष देशमुख यांनीही सचिन कल्याणशेट्टी यांच्या निर्णयाविरोधात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयावर तोफ डागली आहे. काँग्रेससोबतची युती आपल्याला अमान्य आहे, असे सांगून भाजप कार्यकर्त्यांसाठी आपण निवडणूक लढविण्यावर ठाम आहोत, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे देशमुख-साठे यांचे पॅनेल कल्याणशेट्टी, माने-हसापुरेंच्या पॅनेलला लढत देऊ शकेल, असे बोलले जात आहे.
साठे-देशमुख पुन्हा एकत्र येणार?
सोलापूर जिल्हा परिषद आणि उत्तर तालुका पंचायत समितीच्या २०१७ च्या निवडणुकीत बळीराम साठे आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यात युती झाली हेाती. त्यावेळी प्रथमच पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकून पक्षाचा सभापती झाला होता, त्यामुळे देशमुख-साठे पुन्हा एकदा युती होते का हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.