Karad, 02 February : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये भाजपला ‘नंबर वन’ स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कऱ्हाड (जि. सातारा) येथे पार पडली.
कऱ्हाड (Karad) येथील एका अलिशान हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत स्थानिक ते विभागीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आमदार गोपीचंद पडळकर, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, विभागीय संघटक मकरंद देशपांडे, कार्यकारिणी सदस्य विक्रम पावसकर तसेच सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगामी निवडणुकांमध्ये संघटनात्मक ताकद वाढवणे, बूथनिहाय नियोजन मजबूत करणे आणि मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच वाढवणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पदाधिकाऱ्यांना नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकांमध्ये जसे यश मिळाले, तसेच यश जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही मिळवायचे आहे.
प्रत्येक तालुका, प्रत्येक गट आणि प्रत्येक बूथवर कमळ फुलले पाहिजे असे आवाहन केले. त्यांनी संघटनात्मक शिस्त, सातत्यपूर्ण संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या कामांचा उल्लेख करताना चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. लोकहिताच्या योजना, विकासकामे आणि शेतकरी-सामान्यांसाठी घेतलेले निर्णय यांची माहिती प्रभावीपणे मांडली तर मतदारांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी बजावले.
वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीसाठीचे मायक्रो प्लॅनिंग हा चर्चेचा मुख्य विषय होता. मतदानास अवघे चार दिवस शिल्लक असताना प्रचारात काही त्रुटी राहिल्या आहेत का, मतदारांशी संपर्कात कोणत्या अडचणी येत आहेत, स्थानिक पातळीवर विरोधक कोणते मुद्दे मांडत आहेत, याचा आढावा घेण्यात आला.
पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील राजकीय स्थिती, संभाव्य अडचणी आणि संघटनात्मक गरजा मांडल्या. त्या अनुषंगाने उर्वरित काळात अधिक प्रभावी प्रचारासाठी दिशा ठरवण्यात आल्या. बूथ कमिटी सशक्त करणे, लाभार्थी संपर्क मोहीम राबवणे, सोशल मीडियाचा वापर वाढवणे आणि स्थानिक नेतृत्व सक्रिय ठेवणे यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. तरुण कार्यकर्त्यांना प्रचारात अधिक संधी देणे आणि महिला मतदारांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुंबईहून खास विमानाने कराडला आले होते. यावरून या बैठकीला पक्षश्रेष्ठींनी दिलेले महत्त्व अधोरेखित झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक राजकीय समीकरणांना आव्हान देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भक्कम कामगिरी करण्याचा भाजपचा निर्धार या बैठकीतून स्पष्ट झाला. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. आता या रणनितीचा प्रत्यक्ष निकाल मतदान पेटीत कितपत उमटतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.