Solapur, 27 January : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री जाहीर झाला. त्याचे औचित्य साधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रजासत्ताक दिनी घरी जाऊन चितमपल्ली यांचा सत्कार केला. त्या वेळी अरण्यऋषींनी निसर्गाची काही गुपिते गोरे यांना सांगितली. विशेषतः प्राण्याविषयीची बरीच माहिती चितमपल्लींनी पालकमंत्र्यांना दिली.
चितमपल्ली यांचा सत्कार केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी प्राण्याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. ते म्हणाले, निसर्गाने प्रत्येक प्राण्याला काहींना काही वेगळी शक्ती प्रदान केलेली आहे. प्राण्यांना दुष्काळाची चाहूल मानवाच्या खूप अगोदर लागते. त्यामुळे दुष्काळाला तोंड देण्याची आणि दुष्काळात आपली पिढी वाचविण्याची तजबिज प्राणी करतात.
निसर्गावर येणारी संकटे माणसांच्या खूप अगोदर प्राणी आणि पक्षींना समजतात. तसे संकेतही ते मानवला देत असतात. योग्य निरीक्षण करणाऱ्या निसर्ग अभ्यासकला ते समजते. दुष्काळ पडणार आहे, हे माकडे, अस्वले, कावळे यांच्यासह अने पशूपक्ष्यांना समजते. दुष्काळ पडण्याची चाहूल माकडांना खपू आधीच लागते. दुष्काळात आपण मेलो तरी आपली पिले जगली पाहिजेत. त्यासाठी ते भूकलाडू आणि तहानलाडू करून ठेवतात. हे भूकलाडू आणि तहानलाडू खाऊन माकडाची पुढील पिढी जगते. आपली पुढची पिढी जगली पाहिजे, असा त्यामागील उद्देश आहे, असेही मारुती चितमपल्ली (Maruti Chitampalli) यांनी नमूद केले.
अस्वलाच्या गुहेत आढळते भाकरी
दुष्काळ येणार असेल तर अस्वल मधाच्या पोळ्यापासून भाकरी करून ठेवतात. जंगलातील माकडांच्या घरात जसे भूकलाडू, तहानलाडू आढळतात. तसेच, अस्वलांच्या गुहेत भाकरी करून ठेवलेल्या आढळल्या की दुसऱ्या वर्षी दुष्काळ येणार, हे निश्चित असते. हरीण कावळे अशा अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यांचे ठोकताळे या वेळी मारुती चितमपल्ली यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सांगितले.
काय असतात भूकलाडू-तहानलाडू
लहानपणी आजीच्या गोष्टीत तुम्ही एकलेले भूकलाडू तहानलाडू नेमके असतात, तरी काय हे मारती चितमपल्ली नेहमी सांगतात. ते सांगतात की, भूकलाडू आणि तहानलाडू हे माकडे आपल्या पिलांसाठी बनवितात. जेव्हा अन्नपाण्याची भरपूर उपलब्धता असते. मात्र पुढील वर्षी दुष्काळ येणार आहे, याची माकडांना चाहूल लागते, तेव्हा माकडे पाने, फळे फुले चावून त्याचा चोथा करतात. त्या चोथ्यापासून गोळ तयार करतात. हे गोळे म्हणजेच भूकलाडू-तहानलाडू होय. तेच खाऊन माकडांची पिल्लं दुष्काळात आपली भूक भागवतात.
तरुणांना लाजवणारा उत्साह
मारुती चितमपल्ली यांचे वय 94 वर्षांचे आहे. मात्र, त्यांचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल, असा आहे. वय वाढले, शरीर थकले तरी स्मरणशक्ती आणि बुद्धीमत्ता अजूनही तल्लख आहे. ते आजही चष्मा न वापरता वाचन करतात. आजही ते छान गप्पा मारतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.