Tanaji Kharat-Shivanand Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Politic's : परिचारक अन्‌ भालके समर्थक पुन्हा एकत्र येणार?; झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका तुल्यबळ होणार

Zilla Parishad-Panchyat Samiti Election 2026 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आघाडीने की पक्षीय पातळीवर लढायची याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवानंद पाटील व तानाजी खरात यांना दिल्याने मंगळवेढ्यातील राजकीय गणिते निर्णायक ठरणार आहेत.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 08 January : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आगामी निवडणूक समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढायची की पक्षीय पातळीवर? याचे सर्वाधिकार श्री संत दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील आणि उपाध्यक्ष तानाजी खरात यांना संचालक मंडळाने दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंगळवेढ्यात समविचारी आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी मंगळवेढा तालुक्यातील अनेक ज्येष्ठांना एकत्र करून समविचारी आघाडी उभारली होती. त्या आघाडीच्या माध्यमातून भालके आणि परिचारक समर्थकांनी दामाजी कारखान्यावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीच्या बैठकीत किरकोळ कुरबुरी झाल्या होत्या. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत या आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात लढण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीने घेतली. त्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांना विजयी करण्यात यश मिळविले. मात्र, सत्ता भाजपच्या ताब्यात राहिली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुका समविचारी आघाडी एकत्रपणे लढणार की कसं, याची चर्चा सुरू असतानाच श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीबाबत भूमिका घेण्याचे अधिकार हे अध्यक्ष शिवानंद पाटील आणि उपाध्यक्ष तानाजी खरात यांना दिल्याची माहिती आहे.

कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे, तर उपाध्यक्ष तानाजी खरात हे भगीरथ भालके समर्थक मानले जातात, त्यामुळे हे दोघे आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांसह वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून पुढची रणनिती ठरवणार आहेत. आघाडीतील काही नेते व दामाजीचे जवळपास 17 संचालक हे ग्रामीण भागातील आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात आपले वर्चस्व ठेवणे महत्त्वाचे आहे. समविचारी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिल्यास जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठीची निवडणूक आणखी चुरशीची होऊ शकते.

दामाजी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची कामगिरी समाधानकारक असून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास तशी यंत्रणाही उपलब्ध होऊ शकते. शिवाय अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्याकडे त्यांच्या समाजाची व्होटबॅंकही आहे. त्यांचा संपूर्ण तालुकाभर प्रभाव आहे, त्या दृष्टीने येत्या काही दिवसांतील समविचारी आघाडीच्या हालचाली निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT