Prakash Ambedkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Ambedkar On Congress : प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचं वावडं? थेट निशाणा साधत केला 'प्रहार'

Rahul Gadkar

कोल्हापूर : 9 मार्च | एकीकडे महाविकास आघाडीबरोबर ( Mahavikas Aghadi ) जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) वारंवार चर्चेला जात आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतीलच घटक पक्षांवर आंबेडकर प्रहार करताना दिसत आहेत. शुक्रवारी ( 8 मार्च ) कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी भाजपबरोबर काँग्रेसवरही हल्लाबोल केला. इचलकरंजी येथे 'राजकीय न्याय हक्क निर्धार विराट' सभा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पार पडली. "महाविकास आघाडी व्हावी, अशी ‘वंचित’ची भावना आहे. मात्र, यात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले आहेत," असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

"काँग्रेसमधील घराणेशाहीचा फायदा नरेंद्र मोदी घेत आहेत. देश अजून तुटलेला नसून जुळलेला आहे. तरीदेखील ‘देश बचाओ’सारखी यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवत आहेत. एकीकडे बिघाड करत राज्यातील बडे काँग्रेसचे नेते सुपारी बहाद्दर झाले आहेत. अशा सुपारी बहाद्दरांना वेळीच आवर घातला नाही, तर लोकसभेनंतर सगळे जेलमध्ये जातील," असा घणाघात प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाजप सत्तेवर आले, तर आरक्षण संपणार"

"इचलकरंजी वस्त्रनगरीची ओळख अलीकडे दंगलीचे शहर म्हणून झाली आहे. धर्म धोक्यात आहे, त्याला भाजप वाचवणार, असे सांगत धर्माच्या नावाखाली गैरप्रकार, गैरप्रचार सुरू आहेत. यापुढे सावधानतेने पावले टाकावी लागणार आहेत. संविधान संपले तर निवडणुका संपतील आणि भाजप सत्तेवर आले तर आरक्षण संपणार आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी नाही. देशाची वाट लावणारे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, ही जबाबदारी उचलली पाहिजे," असं आवाहन आंबेडकरांनी केलं.

"भांडणं तुमची, खापर आमच्यावर"

"महाविकास आघाडीची लोकसभेसाठी गट्टी जमली नसताना आम्हाला जागा किती हव्याl, असे विचारत आहेत. 15 जागांवरून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भांडणात जागांचा ताळमेळ बसेना झाला आहे. एकमेकांबरोबर भांडणारी महाविकास आघाडी याचे आमच्यावर खापर फोडत आहे," असा आरोप आंबेडकरांनी केला.

"मोदी देशाला कर्जात बुडवून संन्यासाला जातील"

"भाजप लुटारू सरकार आहे, तर काँग्रेसवाले ( Congress ) भुरटे चोर आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत देशावरील कर्ज 24 टक्क्यांवरून 84 टक्क्यांपर्यंत नेले आहे. अशा कर्जात मोदी देशाला कायमचे बुडवून एक दिवस संन्यासाला जातील. त्यामुळे देश बुडवणाऱ्या बेजबाबदार पंतप्रधानांना पुन्हा संधी नाही," असा हल्लाबोल आंबेडकरांनी केला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT