Dhirendra Shastri-Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vikhe Patil Angry to Dhirendra Shastri : बागेश्वरबाबांच्या विधानावर विखे पाटील संतापले : ‘तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे’

सरकारनामा ब्यूरो

नगर : साईबाबांविषयी मुक्ताफळे उधळणाऱ्या धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. ज्या संतांनी समाज उभारणीचे केले आहे, त्यांच्यावर बोलणाऱ्या तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही चार भिंतीत धर्माचा काय प्रचार करायचा आहे तो करावा. पण दुसऱ्यांचा अवमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडले. (Radhakrishna Vikhe Patil got angry at Bageshwar Baba's statement)

धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘संताची पूजा करायची, तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. मात्र, ईश्वर नाहीत," असे ते म्हणाले.

विखे पाटील म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. साईबाबांविषयी सातत्याने अशी वक्तव्ये करण्याचे काम सुरू आहे, हे मुळातच चुकीचे आहे. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी महाराजांनी जे थोतांड मांडले आहे. त्याबद्दल मी काय बोलावे. अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेने दिलेले आव्हान हे बागेश्वर बाबा स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे देवाचे नाव घेऊन जे लोक बुद्धीभेद करण्याचे काम करतात. माझी सरकारकडे मागणी आहे, की अशा लोकांवर गुन्हे दाखल करावेत. हे लोक धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता निर्माण करतात.

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांमध्ये भाविक भक्त परमेश्वराचे रूप पाहतात. बाबांनी तर माणसांमध्ये परमेश्वर पाहिला होता; म्हणून तर आपण त्यांना ‘सबका मलिक एक’ असे मानतो. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश त्यांनी आपलेला दिलेला आहे. एखाद्याच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच संंतांनी लोक कल्याण, लोक जागृतीच्या माध्यमातून एकसंघ समाज उभारणीचे काम केले आहे. त्या संतांमध्येच आपण देव पाहत आलो आहोत. तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांना धर्माचा काय प्रचार करायचा असेल तो त्यांनी चार भिंतीत करावा. परंतु दुसऱ्यांचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT