Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti: "इतका लबाड मुख्यमंत्री हयातीत पाहिला नाही!" राजू शेट्टींची बोचरी टीका; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधक एकवटले

Raju Shetti, Shaktipeeth Highway, Kolhapur Protest: कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चात राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महामार्गामुळे शेतकरी, जमीनधारक आणि पूरस्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली.

Rahul Gadkar

Shaktipeeth Highway: कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या मोर्चात बोलताना, "इतका लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत बघितला नाही. दुसऱ्याला पुढे करतो आणि आपण मागे थांबतो. हा शक्तिपीठ महामार्ग तुम्ही कशासाठी करता? आमच्या जीवावर का उठता? लक्षात ठेवा हे कोल्हापूर आहे. टोलला पळवून लावणारी आम्ही माणसे आहोत. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. जर कोल्हापूरवर अन्याय होत असेल तर आमचा माणूस कोणाला ऐकत नाही. संयुक्त मोजणी करायला आले तर पेटवून द्या." अशा संतप्त भावना माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केल्या.

"मी असं ऐकलं की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे नक्की व्हा. पण अदानीला खुश करून पंतप्रधान होऊ नका. शेतकऱ्यांना खुश करून पंतप्रधान व्हा." असेही ते म्हणाले.

"कोल्हापूर जिल्ह्याचं वाटोळ करायचं राज्य सरकारने ठरवलं आहे. कारण पंजाबनंतर दरडोई उत्पन्न देणारा कोल्हापूर जिल्हा आहे.आम्हाला कोणत्याही देवाला जायला अडचण नाही. अनेक रस्ते उपलब्ध आहेत. मग शक्तीपीठ करण्यासाठी देवाचं नाव कशाला घेता." असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

"आम्ही विकासाला विरोध करत असतो तर नागपूर - रत्नागिरी महामार्गाला विरोध केला असता. कोल्हापूर - वैभववाडी हा रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. मात्र तो रस्ता पूर्ण करण्यासाठी या सरकारची मानसिकता नाही. ८५६ किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी तुम्हाला १ लाख कोटी कशाला लागतात? नाशिक ते अक्कलकोट हा ३६४ किलोमीटरचा रस्ता 19 हजार कोटीत पूर्ण होत असेल तर ८५६ किलोमीटरचा रस्त्याचा खर्च १ लाख कोटी कसा? सरकारचं हे गौडबंगाल नेमकं काय आहे? सरकारचे असले धंदे येथे चालणार नाहीत." असंही शेट्टी म्हणाले.

" महामार्गामुळे महापुरात अनेक गावात पाणी थांबून राहील. जर महापुर आला, पाणी तुंबून राहिलं तर जिल्ह्यातील २५ लाख टन उसाचा फटका जिल्ह्याला बसेल. ज्याची जमीन जाते त्याचं वाटोळ होणार नाही, कदाचित होईलही. पण ज्याची जमीन जाणार नाही, त्याचं मात्र महापुरामुळे वाटोळ होईल. या महामार्गामुळे महापुराच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झाले तर जिल्ह्याची अवस्था काय होईल? अलीकडे काही चिल्लीपिल्ली या महामार्गाचे समर्थन करत आहेत, त्यांनी याचा विचार करा." असंही शेट्टी म्हणाले.

" तुमच्यात दम असेल तर संयुक्त मोजणी करायला या. मग होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. अनेक जिल्ह्यात मोजणी झाल्याचा दावा करतात मात्र मोजणी कुठेच झालेली नाही. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत किती एकर मोजणी झाली एकदा जाहीर करा. मी आतापर्यंत १३ जिल्ह्यात जाऊन आलेलो आहे. या शक्तीपीठ महामार्गाचा ठेकेदार गुजराती आहे. सर्वे करायला येणारी यंत्रणा खाजगी आहे, त्यामुळे सगळं पेटवून द्या. कोणत्याही सरकारी मालमत्तेचे नुकसान होत नाही." असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

" या आंदोलनाला रेडा आला आहे. मात्र पोलिसांनी या रेड्याला अडवलं. त्याचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही त्याला गुवाहाटीला पाठवणार नाही. पण या रेड्याचा पोलिसांवर विश्वास नाही. कारण हे पोलीस त्या रेड्याला गुवाहाटीला पाठवतील. मात्र आम्ही या रेड्याला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आहे. जोपर्यंत तेरा जिल्ह्यांत शक्तिपाठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही" महाराष्ट्राच्या बोकांडीवर एक लाख कोटीचे कर्ज टाकण्याचे षडयंत्र असल्याचे शेट्टी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT