

Solapur, 17 May : नियोजित शक्तीपीठ महामार्गास विरोध दर्शविण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. मात्र, वेळीआधीच आंदोलन गुंडाळू पाहणारे पोलिस आणि राजू शेट्टी यांच्यात जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. मला ४० मिनिटांचा हिशेब द्या म्हणत शेट्टी यांनी आम्ही बेमुदत रास्ता रोको करणार आहे, काय करणार आहे, अशा शब्दांत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्यानंतर अवघ्या १५ मिटिटांतच पोलिसांनी शेतकऱ्यांना महामार्गावरून हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी पोलिसांना आव्हान दिले. पोलिसांनी दडपशाही केल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी संयमाची भमिका घेतल्याने सर्व मान्यवरांची भाषणं होईपर्यंत जवळपास १ तास रास्ता रोको करण्यात आला.
शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून जात आहे. त्याला विरोध दर्शविण्यासाठी अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथे सोलापूर-पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पोलिस आणि राजू शेट्टी यांच्या मतभेद झाले. पोलिस अधिकाऱ्याने ४० मिनिटे वक्ते बोलल्याचे सांगितले. त्यावर शेट्टी यांनी मला तुम्ही ४० मिनिटांचा हिशेब दाखवा, एका मिनिटांत मी रास्ता रोको मागे घेतो, असे म्हणत चॅलेंज दिले.
राजू शेट्टी यांनी वेळेचा हिशेब मागताच पोलिसांना तो देता आला नाही. मला आंदोलनाची ४० मिनिटे दाखवा आधी. खोटं बोलायचं नाही, अशा शब्दांत शेट्टी यांनी पोलिसांना सुनावले. त्याचवेळी दुसरे अधिकारी त्यांना साहेब तुम्ही बोला, असे सांगत होते. पण संतापलेल्या शेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्याला जरा जबादारीनं बोलायचं, कोणाला बोलताय माहीत आहे का तुम्हाला? जबाबदारीनं वागायचं. काय समजताय स्वतःला? आम्ही रास्ता रोको आंदोलन बेमुदत करणार आहे, काय करणार आहे, तुम्ही? काय करणार आहे? असा प्रश्नांचा भडीमार शेट्टी यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर केला.
शेट्टी यांचा आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे काहींशा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, शेवटी राजू शेट्टी यांनीच शेतकऱ्यांना बसून घ्या म्हणत संयमाची भूमिका घेतली. कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आपल्याला पोलिसांसोबत भांडण काढायचं नाही. एखादा असतो म्हणत शेट्टी म्हणाले, पोलिसांनी समजूतदारपणाची घेतली आहे, आपणही घेऊ. पोलिसांमधील ८० टक्के लोक हे शेतकरीच आहेत. एखादा अपघात झाल्यानंतर रस्ता बंद होतो, तसं शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे रास्ता रोको होत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, असे स्पष्ट केले.
एका मोठ्या पोलिस अधिकाऱ्याचीही जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे आणि ते मला सांगतात की काहीतरी करा आणि आमची जमीन वाचवा. ते आयपीएस अधिकारी आहेत. हा शक्तीपीठ महामार्ग काही गरजेचा नाही. रत्नागिरी महामार्ग आठपदरी केला तरी शेतकऱ्याची जमीन घ्यावी लागणार नाही. एवढी जमीन त्या ठिकाणी घेऊन ठेवलेली आहे. शक्तीपीठ करून २७ हजार एकर बागायती जमिनीचं वाटोळं करू नका, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.