Raju Shetti-Eknath Shinde
Raju Shetti-Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टी भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना...जाणून घेणार ती गोष्ट!

सरकारनामा ब्यूरो

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील २५ कारखान्यांनी गतवर्षीच्या रिकव्हरीच्या धर्तीवर एकरकमी एफआरपी दिली आहे. मात्र, सातारा (Satara) जिल्ह्यात उसाला खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळणे, हे दुर्दैवी आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी व दोनशे रुपये तसेच हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिटन साडेतीनशे रुपये मिळावेत या मागण्यांसाठी येत्या सात नोव्हेंबर रोजी पुणे येथे साखर संकुल कार्यालयावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली. (Raju Shetti will meet Chief Minister Eknath Shinde)

कोल्हापूर (जयसिंगपूर) येथे ऑक्टो 2022 मध्ये शेतकऱ्यांची राज्यस्तरीय उस परिषद झाली. शेतकऱ्यांच्या दबावगटांमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २५ कारखान्यांनी गतवर्षीच्या रिकव्हरीवर एकरकमी एफआरपी दिली . परिषदेतल्या ठरावांची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी राजू शेट्टी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरूवारी साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात गतवेळी साखर कारखानदारांनी जाहीर केलेल्या घाेषणा या हवेतच विरल्याचे दिसून येत आहेत. उसाच्या दरात एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या सातारा जिल्ह्यातील उसाला आज खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी भाव हा दुर्दैवी ठरला आहे. एकरकमी एफआरपी अधिक दोनशे रुपये, उस तोडणी मजुरांची गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे नोंदणी, कारखानदारांना डिजिटल वजन काट्यांची सक्ती या मागण्यांसाठी साखर संकुल कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अलका थिएटर चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

राजू शेट्टी म्हणाले की, ऊस तोडणीच्या नावाखाली खर्च दाखवणाऱ्या तसेच रिकव्हरी चोरून उसाच्या वजनात काटामारी केली जाते. साखर कारखानदारांच्या उधळपट्टीला शेतकऱ्यांची मूकसंमती असेल, तर उसाला दर कसा मिळणार? असा सवाल शेट्टींनी केला. महाराष्ट्रातील उस तोड मजूरांचे १७ व १८ नोव्हेंबर रोजी काम बंद आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या तत्परतेने अन्य घटकांना रात्रीत निर्णय घेऊन मदत जाहीर केली. तीच तत्परता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांबद्दल दाखविली असती तर त्यांच्याबाबत आम्हाला निश्चितच आदर वाटला असता असे शेट्टींनी नमूद केले. यंदाच्या अतिवृष्टीतही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गावी उत्तम शेती कशी केली? हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना भेटणार आहे. शेतकऱ्यांची काळजी विरोधी पक्षनेते घेतात आणि सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना विसरतात. महाविकास आघाडी काय किंवा शिंदे सरकार काय यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीचे केवळ १३ हजार ५०० रुपये भरपाई शेतकऱ्यांना जाहीर केली, हे दुर्दैवी असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT