Kolhapur News : दिवसेंदिवस राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडीमधील दूधगंगा धरणाची गळती वाढत चालली आहे. ही धक्कादायक बाब आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी गेल्यावेळी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर गळती काढण्यासंदर्भात 80 कोटीचा निधी प्राप्त झाला. मात्र, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. काँग्रेसने ते सतेज पाटील यांनी नागपूरच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतरही या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी धरणावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. (Raju Shetty News)
शासकीय आकडेवारीनुसार प्रति सेकंद धरणाची गळती ही साडेतीनशे लिटर आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी धक्कादायक खुलासा करत प्रति सेकंद ही गळती 650 ते 750 लिटर असल्याचा दावा केला आहे. काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दुधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास 650 ते 700 लिटर पाणी या गळतीमधून वाया जावू लागले आहे.
याबाबत शासनाने येत्या 15 दिवसात कार्यवाही न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या गळतीमध्ये कापडी बोळे भरून शासनाच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात काळम्मावाडी धरण गळतीकडे राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रति सेकंद 270 लिटर गळती असल्याची माहिती दिली होती.
काळम्मावाडी धरणाच्या गळतीबाबत स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांच्यासोबत राजू शेट्टी यांनी शुक्रवारी धरणाच्या गळतीच्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. दुधगंगा धरणातून झालेल्या गळतीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून 2022 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून बेदखल करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस या गळतीचे प्रमाण वाढत असून संपूर्ण धरणाच्या भिंतीना पाझर दिसू लागला आहे. ठेकेदार व अधिका-यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच गळतीचे प्रमाण वाढू लागले आहे. गळतीमुळे धरणाचा पाणीसाठा कमी होवून ऐन उन्हाळ्यात व जूनमध्ये पाऊस लांबल्यास यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता पडण्याची शक्यता आहे. यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताचा विचार करून भ्रष्ट कारभाराचे हितसंबंध बाजूला ठेवून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.