Sadabhau Khot and MP Dhairyasheel Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot : सदाभाऊंनी वाढवलं धैर्यशील मानेंचं टेन्शन; हातकणंगलेच्या जागेवर केला दावा

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवरच सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी सध्या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. जागा वाटपाच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. यातच महायुतीचा घटक पक्ष रयत क्रांती संघटनेने शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने यांचे टेन्शन वाढवले आहे.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी हातकणंगलेच्या जागेवर दावा सांगितला असून लोकसभेची ही जागा लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांनी आपला दावा या जागेवर सांगितला आहे. त्यामुळे आता महायुतीत लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या निवडणुकीत आमची हक्काची असलेली जागा शिवसेनेला दिली होती. मात्र आता ती आम्हाला परत द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदाभाऊ खोत यांच्या या मागणीवर भाजप आणि शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कारखानदारीच्या प्रश्नांवरून सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली. तसेच सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. या भेटीनंतर खोत म्हणाले, 'आपण जर खुली अर्थव्यवस्था स्वीकारली असेल तर दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकावी, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे, ते शून्य करण्यात यावे, तसेच ज्याला ज्याला साखर कारखाना काढायचा आहे, त्यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खोत यांनी केली.

सध्या महाराष्ट्रामध्ये 110 खासगी साखर कारखाने आहेत, तर 100 साखर कारखाने हे सहकारी आहेत. म्हणजेच खासगी साखर कारखान्यांची संख्या ही सहकारी साखर कारखान्यांपेक्षा जास्त झाली आहे आणि हे खासगी साखर कारखाने फक्त पंधरा ते वीस लोकांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे या वीस लोकांना पोसण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी ऊस लावत नाही, तर त्यांनी लावलेला ऊस शेतात वाळवू द्यायचा की त्याची दारू बनवायची, त्याचा अधिकार शेतकऱ्याला द्यायला हवा, असं खोत म्हणाले. एकीकडे सूत गिरण्या, दूध संघ, बीअर बार, कितीही काढा आणि दुसरीकडे साखर कारखाने काढण्यास बंदी का घालण्यात येते? त्यामुळे ही बंदी उठवण्याची मागणी सरकारकडे केली असल्याचं खोत म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT