Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : जयंत पाटलांना होमग्राऊंडवरच धक्का : मोठं घराणं भाजपमध्ये आणण्यासाठी महाडिकांच्या जोडण्या

BJP Politics Against Jayant Patil : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असून याचे केंद्र आता इस्लापूर होताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

थोडक्यात बातमी :

  1. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून यामुळे मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

  2. भाजपने अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे व विश्वनाथ डांगे यांना पक्षात घेऊन जयंत पाटील यांना होम ग्राऊंडवर आव्हान दिलं आहे.

  3. या पक्षप्रवेशामुळे सम्राट महाडिक यांच्या भाजपमधील स्थिती भक्कम झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हे मोठं आव्हान ठरू शकतं.

Sangli News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे इस्लामपूर मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीत शांतता पसरली होती. पण आता जयंत पाटील आगामी स्थानिकच्या जोडण्या लावण्यासाठी मतदारसंघातच असतील याचे समाधानही व्यक्त केलं जात आहे. यामुळे प्रमुख विरोधकांना धाम फुटला आहे. अशातही भाजपने आपला आक्रमकपणा कमी केला नसून जयंत पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. भाजपने आगामीच्या तोंडावर पाटील गटाला धक्का देत अण्णासाहेब डांगे तसेच त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष चिमण डांगे व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांना पक्षात घेण्याची रनणीती आखली आहे. या पक्षप्रवेशामुळे जयंत पाटील यांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर सम्राट महाडिक तगडे आव्हान निर्माण करू शकतात.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महायुतीतील तिन्ही पक्ष आगामी स्थानिकच्या मोर्चे बांधणीसाठी लागले आहेत. याच पार्श्वभूमिवर प्रमुख चेहरे हेरून त्यांचा पक्ष प्रवेश केला जात आहे. दरम्यानच्या काळात भाजपने महापालिकेतील मोठा गट असणाऱ्या मदनभाऊ पाटील गटाच्या सर्वेसर्वा जयश्रीताईंना आपल्याकडे खेचत काँग्रेसला धक्का दिला होता. यामुळे महापालिकेत आता भाजपला मोठी संधी निर्माण झाली आहे.

त्यानंतर आता भाजपने दुसरा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह जयंत पाटील यांच्या गटाला दिला आहे. भाजपने डांगे बंधूना आपले दरवाजे उघडले आहेत. मुंबईत वर्षा बंगल्यावर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, तसेच अ‍ॅड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी मंगळवारी (ता.15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. येत्या आठवडाभरात समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

अण्णासाहेब डांगे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, नंतर जनता पक्ष, नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. पण भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा लोकराज्य पक्ष काढला होता. पण तो काही पुढे आला नाही. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले होते. मात्र आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून घरवापसी करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

भाजपची ताकद वाढली

आगामी स्थानिकच्या तोंडावर एकानंतर एक असे मातब्बर नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढत आहे. जयश्री पाटलांपाठोपाठ आता डांगे बंधूही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. हा प्रवेश झाल्यास जयंत पाटील यांना हा मोठा मोठा धक्का असेल.

आता फक्त औपचारीकता बाकी

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम चौंडी येथे झाला होता. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर डांगे यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा झाली होती. तेव्हाच भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला होता. अण्णासाहेब डांगे त्यांचे पुत्र अ‍ॅड. चिमण डांगे इस्लामपूरचे नगराध्यक्ष राहिले असून विश्वनाथ डांगे व चिमण डांगे हे अनेक वर्षे नगरसेवक होते. शहर व परिसरात डांगे गटाचे वर्चस्व असून याआधीही नगरपालिका निवडणुकीत महाडिक-डांगे युती झाली आहे. पण आता ते भाजपमध्ये आल्यास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांची ताकद दुप्पट वाढणार आहे. यामुळे जयंत पाटील यांच्यासमोर होमग्राऊंडवरच तगडे आव्हान निर्माण होऊ शकते.

अण्णासाहेब डांगे कोण?

अण्णासाहेब डांगे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, नंतर जनता पक्ष, नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी 1967 साली जनसंघातून राजकीय वाटचाल सुरू केली. तर 1980 साली भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षात सक्रिय झाले. ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. 1995 साली त्यांना युतीच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री संधी मिळाली होती. तर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं होते. पण 2002 मध्ये त्यांनी भाजप सोडली आणि स्वत:चा लोकराज्य असा राजकीय पक्ष काढला. त्यानंतर 2006 साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. पण ते पक्ष नेतृत्वावर नाराज होते.

प्र. जयंत पाटील यांनी राजीनामा का दिला?
उ: त्यांनी मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

प्र. भाजपने कोणत्या नेत्यांना पक्षात घेतलं?
उ: अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.

प्र. या प्रवेशामुळे काय परिणाम होईल?
उ: जयंत पाटील यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर सम्राट महाडिक आणि भाजपकडून तगडं आव्हान मिळू शकतं.

प्र. याचा स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होईल?
उ: भाजपचा पक्षविस्तार व स्थानिक बालेकिल्ल्यांवर प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT