Vaibhav Naikwadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Political : नागनाथअण्णांच्या 'हुतात्मा'वर नायकवडींचीच पकड...

सरकारनामा ब्यूरो

- अनिल कदम

Sangli Political : क्रांतिवीर पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा साखर कारखान्यावर नायकवडी कुटुंबाची पकड कायम राहिली आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत वैभव नायकवडी यांच्या हुतात्मा पॅनेलने सर्व 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवून कारखान्यावरील अस्तित्व अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.

वैभव नायकवडी यांच्यासोबत आता पुतणे गौरवही संचालक मंडळात सामील झाले. नागनाथअण्णांनी अनेक संघर्षातून उभारलेल्या सहकारी कारखानदारीत या निवडणुकीच्यानिमित्ताने तिसरी पिढी ही सक्रिय झाली आहे. काका - पुतणे कारखाना कशा पद्धतीने हाताळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वाळवा येथील पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यात जिल्ह्यातील अन्य नेत्यांनी लक्ष घातले नसले तरीही विरोधकांना काही मंडळींनी छुपी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यानंतरही हुतात्मा गटाचे सर्व उमेदवार तीन हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

21 जागांसाठी निवडणूक झाली. तत्पूर्वी 9 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तिथेच विरोधी गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर बारा जागांसाठी निवडणूक झाली. नागनाथअण्णा यांनी अनेक राजकीय संघर्ष करीत वाळव्यात साखर कारखाना उभारला. त्यानंतर जिल्ह्यातच नव्हे, राज्यात एक आघाडीचा साखर कारखाना म्हणून नाव मिळवले. एकेकाळी राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून 'हुतात्मा'चे नाव होते.

या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु विरोधकांच्या अट्टहासाने निवडणूक लागली. त्यात सभासदांनी हुतात्मा गटाला ताकदीने साथ दिली. कारखान्याची सूत्रे मागील पंधरा वर्षांपासून अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याकडे आहेत. त्यांच्यासोबत आता पुतणे गौरवही संचालक मंडळात सहभागी झाले आहेत. नागनाथअण्णांनी उभारलेल्या कारखानदारीत या निवडणुकीच्यानिमित्ताने तिसरी पिढी सक्रिय झाली आहे.

दरम्यान, काका - पुतणे कारखाना कशा पद्धतीने चालवणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. या निवडणुकीत नायकवडी यांच्या कुटुंबातील गौरव, वीरधवल आणि केदार नायकवडी यांनी प्रचाराची यंत्रणा सांभाळली. त्याशिवाय विरोधी गटाचे नंदकुमार शेळके आणि अंकुश अहिर यांनी ऐन निवडणुकीत नायकवडी यांना साथ दिली. कारखान्याने साखरेसह इथेनॉलनिर्मितीवर जोर दिला असून प्रतिदिनी 30 हजार लिटर इथेनॉलनिर्मिती होत आहे. कारखान्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

नवीन संचालक मंडळ...

नव्या संचालक मंडळात वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, विश्वास थोरात, तुकाराम डवंग, शरद थोरात, संभाजी पाटील, पांडुरंग पवार, हणमंत पाटील, अरविंद कदम, गंगाराम सूर्यवंशी, लक्ष्मण शिंदे, रामचंद्र भाडळकर, तानाजी निकम, बापूसाहेब पाटील, शिवाजी खामकर, शरद माळी, रामचंद्र पाटील, शिवाजी जावीर, विशाखा कदम, जयश्री अहिर, वैशाली नवले यांचा समावेश आहे.

सभासदांवर निवडणूक लादली...

हुतात्मा साखर कारखान्यात राजकारणाला थारा नाही. सभासदांना निवडणूक नको होती, तरीही ती लादली गेली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी सहकार चळवळ उभी करण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मात्र जिथे राजकारण झाले तिथे संस्था अडचणीत आल्या. हुतात्मा साखर कारखाना राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून शेतकरी, सभासदांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे वैभव नायकवडी यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT