Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Political News : सामना भाजप-काँग्रेसचा; लक्ष जयंतरावांच्या भूमिकेकडे...

Amol Sutar

- अजित झळके

Sangli Political News : लोकसभेच्या निवडणूक महासंग्रामाला फार अवधी राहिलेला नाही. सलग दोन महाविजयानंतर भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध व नव्याने बांधणी सुरू केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवरून चुरस सुरू आहे.

सांगलीत काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी वरिष्ठ पातळीवर चाचपणी सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. मागील काही निवडणुकीत जयंतरावांचा फायदा विरोधकांना झाला असल्याने आगामी निवडणुकीतही त्यांचा कल मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत जयंत पाटील यांचा कल कोणाच्या बाजूने राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक ही सर्वच पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा सांगलीच्या जागेवर आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

2014 चा धक्कादायक पराभव आणि 2019 ला जागा सोडण्याची नामुष्की आलेल्या काँग्रेसने पुढची निवडणूक काट्याची होईल, या विचाराने शांतपणे जुळणी सुरू केली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख पक्षांत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यात होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद सध्या तरी मोठी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या शिंदे गटाचे बळ आमदार अनिल बाबर यांच्यामुळे अधिक आहे. अशा वेळी बेरीज-वजाबाकीची नवी समीकरणे असतील. सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा ऐतिहासिक विजयानंतर प्रचंड आत्मबळ वाढलेली भाजप (BJP) विरुद्ध नव्याने अवसान आणत लढण्यास सज्ज झालेला काँग्रेस, असा सरळ सामना येथे रंगणार आहे.

राष्ट्रवादीने मंथन बैठकांमध्ये सांगलीवर विचार केलेला नाही, त्या अर्थी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीसाठी इच्छुक नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. भारत राष्ट्र समितीने काही चेहरे पक्षात घेत बाहूवर बेंडकुळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेलंगणा विधानसभेत पराभवानंतर त्यांचे अवसान गळाले आहे. त्यामुळे सरळ लढतीत तिसरा पर्याय असेल का, याबाबत सध्या साशंकता आहे.

दुहेरी लढत होणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल, असे ढोबळ संकेत आहेत. तिरंगी लढत झाली तर भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी ‘एमआयएम’ने पत्ता ओपन केला तर आश्‍चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. मतांचे ध्रुवीकरण करून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी हा डाव खेळला जाऊ शकतो, असे आरोप याआधी झाले आहेत.

टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या विस्तारीकरणाला मान्यता, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे हे भाजपसाठी प्रमुख स्थानिक मुद्दे असणार आहेत. लटकलेले ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळ, औद्योगिक विस्तारीकरणाला बसलेली खीळ आदी मुद्द्यांवर विरोधक रान उठवतील. तर संजय पाटील पक्षातील नेत्यांशी साडेचार वर्षे संघर्ष करतील, मात्र शेवटच्या चार-सहा महिन्यांत सगळे पंक्चर्स काढण्याची कला त्यांना अवगत आहे.

आधी आमदार गोपीचंद पडळकरांशी जुळवून घेतले. राज्यातून आदेश आल्यानंतर कडेगाव आणि आटपाडीच्या देशमुखांची फार वळवळ होत नाही, यावर त्यांचा विश्‍वास आहे. पालकमंत्री खाडे आणि आमदार गाडगीळ हे कट्टर भाजप नेते आहेत, त्यामुळे त्यांची बेरीजच गृहीत धरली जाते. उरला विषय विलासराव जगताप यांचा, जतमध्ये दुसऱ्या फळीत खासदार पाटील यांनी संपर्क वाढवत नवी मांडणी केली आहे.

शिवाय, लोकसभेला ताकद दाखवा आणि विधानसभेला दावा करा, असा सरळ संदेश असल्याने विधानसभेचे इच्छुक ‘पहिला पक्ष, मग उमेदवार’ या धोरणाने कामाला लागले आहेत. काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळेल, असे आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी जाहीर केले आहे. ते जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते आहेत. त्यामुळे फारशी उलथापालथ झाली नाही तर विशालच लढतील. ते सध्या सावध आहेत.

त्यांना आधी वसंतदादा कारखान्याची निवडणूक निर्विघ्न पार पाडायची आहे. कारण, पुढच्या संचालक मंडळाच्या काळातच हा कारखाना ‘दत्त इंडिया’कडून संचालक मंडळाच्या ताब्यात येणार आहे. ते जिल्ह्यात फिरताहेत. संपर्क वाढवला आहे, मात्र संजयकाकांएवढा वेग अजून पकडलेला नाही. राज्यातील बदललेल्या स्थितीत जयंत पाटील यांची ‘प्रामाणिक साथ’ विशाल यांना अपेक्षित आहे. त्यावर बरीच गणिते अवलंबून असतील.

चंद्रहार पाटील लोकसभा लढू इच्‍छितात. त्यांनी दंड थोपटले आहेत. मात्र त्यांना अद्याप पक्ष ठरवता आलेला नाही. सध्या ते जयंतरावांचे नेतृत्व मानतात. अजितदादा गटानेही त्यांना आमंत्रण दिले आहे. मात्र दोघांकडेही लोकसभेचे तिकीट नाही. त्यामुळे पैलवानांची कोंडी झाली आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT