Satej Patil Criticized Shinde Govt :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil Criticized Shinde Govt : 'आयत्या बिळावर नागोबा' थेट पाइपलाइनवरून सतेज पाटलांचा शिंदे सरकारला टोला

Rahul Gadkar

Kolhapur Politics : कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरसाठी काळमवाडीतून थेट पाइपलाइनची योजना आखली. या योजनेचे काम नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या थेट पाइपलाइनच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गटाने थेट राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या मिशन नरेंद्र मोदी 2024 या पेजवरून पोस्ट व्हायरल झाल्यानंतर श्रेयवादाचे युद्ध सुरू झाले आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून कोल्हापुरात थेट पाइपलाइनचा प्रश्न गाजत आहे. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका या योजनेत महत्त्वाची राहिली आहे. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी त्यांची धडपड राहिली आहे. मात्र, महायुती सरकारने घेतलेल्या श्रेयावर त्यांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे.

व्हायरल पोस्टमध्ये नेमके काय?

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मिशन 2024 या ट्विटर पेजवरून कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनबद्दल पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आहेत."शिंदे सरकारने कोल्हापूरकरांचे स्वप्न साकारले" अशा आशयाचे मजकूर या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहेत.

सतेज पाटील गटाचे उत्तर

या पोस्टला सतेज पाटील समर्थकांनी उत्तर दिले आहे.'आयत्या बिळावर नागोबा' असे म्हणत 2014 पासून ते आतापर्यंत आमदार सतेज पाटील यांनी थेट पाइपलाइनसाठी पाठपुरावा केला, अशा शब्दातं उत्तर दिले आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते श्रेय

मी पालकमंत्री होणे आणि थेट पाइपलाइन कार्यान्वित होणे हे अंबाबाईचे देणे आहे. आघाडीच्या काळात अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी सासने ग्राउंड येथे त्यांचा सत्कार सभारंभ पार पडला होता. त्यावेळी मी थेट पाइपलाइनचा प्रश्न अजित पवार यांच्याकडे ठाम लावून धरला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी, थेट पाइपलाइनचा प्रश्न मी मार्गी लावणार, त्यासाठी कितीही निधी लागला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटल्याचा दाखला मुश्रीफ यांनी दिला.

तसेच, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 450 कोटी पेक्षा जास्त रुपयांचे काम असल्याने ही मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवली. त्यावेळी शहरी आणि विकास मंत्री कमलनाथ यांनी त्यावर सही केली. देशातली पहिली योजना अशी होती, की काम सुरू होण्याआधी पैसे महापालिकेच्या तिजोरीत आले होते. पण ठेकेदारामुळे झालेल्या विलंबामुळे सहा वेळा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी आम्ही दिल्लीवाऱ्याही केल्या. पण बोलून न थांबता आम्ही हे काम मार्गी लावतोय यात मला आनंद आहे., असे मुश्रीफ म्हणाले.

पुढील महिन्यात शुभारंभ

गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून थेट पाइपलाइनचे काम रखडले होते. काँग्रेस आघाडीच्या काळात मंजूर झालेले काम भाजप सरकारदेखील पूर्ण करू शकले नव्हते. तब्बल दहा वर्षांनंतर हे काम पूर्णत्वास गेले आहे. पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित योजनेचा शुभारंभ सोहळा होईल. ही योजना सुरू झाल्यास कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT