Shahajibapu Patil -Deepak Salunkhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politic's : शहाजीबापूंनी मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडायला हवी होती; दीपक साळुंखेंनी व्यक्त केली नाराजी

Shahajibapu patil Vs Deepak Salunkhe : आपण एकत्र राहू, असे मी गेली दोन वर्षांपासून शहाजीबापूंना सांगत होतो, त्यासाठी आग्रह करत होतो. एकत्र राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी मी शहाजीबापूंकडे वारंवार पाठपुरावा करत होतो.

दत्तात्रय खंडागळे

Sangola, 29 November : सांगोला विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर दोन मित्रांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. दीपक साळुंखेंना आपण छोटा भाऊ मानले, त्यांना आमदारकीचे सर्व अधिकार दिले. ते शिवसैनिकाला दिले असते तर मी पुन्हा आमदार झालो असतो, असे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. त्याला साळुंखेंनी उत्तर दिले असून ‘मोठा भाऊ म्हणून शहाजीबापूंनी एकत्र राहण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती’, असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दीपक साळुंखे (Deepak Salunkh) यांनी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलताना शहाजीबापू यांनी घेतलेल्या भूमिकेवर दीपक साळुंखे यांनी बोट ठेवले आहे. ते म्हणाले, आमचे मोठे भाऊ आणि सांगोला तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणून शहाजीबापू पाटील यांनी एकत्र राहण्याची भूमिका घ्यायला हवी होती.

आपण एकत्र राहू, असे मी गेली दोन वर्षांपासून शहाजीबापूंना (Shahajibapu Patil) सांगत होतो, त्यासाठी आग्रह करत होतो. एकत्र राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठ नेतेमंडळींना भेटून आपण दोघांनीही आपापली भूमिका मांडूया, यासाठी मी शहाजीबापूंकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. आमचे मोठे भाऊ म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडायला हवी होती, मात्र त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, असेही दीपक साळुंखेंनी स्पष्ट केले.

साळुंखे म्हणाले, सांगोला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनेच आपला पराभव केला आहे. पण पराभवामुळे मी खचून जाणार नाही, त्यामुळे कार्यकर्ते सांगतील, तेच आमचे धोरण असेल.

माजी आमदार साळुंखे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवली. निवडणुकीत मी माझ्या पूर्वजांची पुण्याई सांगत बसलो नाही. जाती पातीचे राजकारण करून मते मागितली नाहीत, त्यामुळे पराभवालासुद्धा ताठ मानेने समोरे गेलो. जनतेनेही पैशाच्या राजकारणाला कंटाळून तालुक्यातील स्वाभिमानी ५१ हजार मतदारांनी मला मतदान केले. या स्वाभिमानी जनतेच्या पाठिंब्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहे.

आतापर्यंत केलेली विकासकामे आणि जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली. विधानसभेत झालेला पराभव मान्य करून आपण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तालुक्यातील जनतेच्या कामाला लागलो आहे, असेही दीपक साळुंखे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT