Satara, 22 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीवेळी सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. त्या राड्यातच भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी आपला माणूस बसवला. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये इशाऱ्याची स्पर्धा रंगली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आव्हानाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर देताना पालकमंत्र्यांनी जे पेरले, तेच आता उगवले आहे. सदस्यांना ४५ दिवस डांबून ठेवले, त्यावेळी ‘यशवंतविचार’ कुठे गेला होता, आम्ही बोललो तर फार गंभीर होईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) निवडणुकीत भाजपकडे २७ संख्याबळ होते, तसेच एक बंडखोर भाजप सदस्य निवडून आला होता. त्यामुळे भाजपकडे २८ संख्याबळ होते. बहुमतासाठी भाजपला आणखी पाच मतांची गरज होती. मात्र, शिवसेना राष्ट्रवादीचे सदस्य फोडून भाजपने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड केली. विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडे ३७ सदस्यांचे संख्याबळ होते. मात्र, प्रचंड राड्यानंतर भाजपने साताऱ्यात यश मिळविले, त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई हेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीवेळीच आकांडतांडव करत होते. पोलिसांना वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले आहे. ते पोलिसांना घरगड्यासारखे बोलत होते. एसपी आणि पोलिसांना एकेरी भाषेत बोलत होते, असा आरोपही जयकुमार गोरेंनी (Jaykumar Gore) देसाईंवर केला.
ते म्हणाले, लोकशाहीच्या गप्पा मारताना झेडपीच्या गेटच्या आत जाण्याचे त्यांचे कारण काय? झेडपीत बैठक लावण्याचे कारण काय? ३०७ चा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला हाताला धरून नेताना गुन्हा कोणी दाखल केला आहे, हे त्यांनी सांगितले नाही.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या त्यांच्या सदस्यांवर विश्वास नव्हता; म्हणूनच त्यांनी आपल्या सदस्यांना ४५ दिवस डांबून ठेवले. आम्ही लोकशाहीचा खून केला म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेत स्वतःच उच्छाद मांडला होता. त्यावेळी यशवंत विचार कुठे गेला होता, असा सवालही गोरेंनी केला.
पालकमंत्री खूप आवडतात; त्यांना बदलण्याची मागणी का करू?
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना बदलण्याची मागणी तुम्ही करणार का?, या प्रश्नावर मंत्री गोरे म्हणाले, पालकमंत्री देसाई हे आम्हाला खूप आवडतात, त्यामुळे आम्ही त्यांना बदलण्यास कशासाठी सांगू? तेच पालकमंत्री राहावेत, असे आम्हाला वाटते. गोरे यांनी मांडलेल्या मताला मंत्री शिवेंद्रराजेंनीही पाठिंबा दिला.
एका लुगड्यावर ते म्हातारे होणार आहेत का?
जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. त्यामध्ये सर्व पुरावे आहेत. त्यामुळे सुरुवात त्यांनी केली. शेवट आम्ही करू, असे सांगून एका लुगड्यावर ते म्हातारे होणार आहेत का?, असा प्रश्न मंत्री गोरे यांनी उपस्थित केला. भाजप स्वतःची ताकद लावून लढला असून, जिल्हा परिषदेत पक्षाच्या माध्यमातून चांगले काम करेल. आजपर्यंत आम्ही संयम ठेवला आहे. आम्ही बोललो तर फार गंभीर होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.