Sugarcane In Solapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Sugarcane Politics : शेतकऱ्यांची काळजी की मतांची बेगमी ? सोलापुरात ऊसदरासाठी कारखानदारांची स्पर्धा

Harshal Bagal

Solapur Political News : काही महिन्यांवर आलेली लोकसभा आणि वर्षभरात होणारी विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस कारखानदार कधी नव्हे ते यंदा शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेताना दिसत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी निवडणुकांच्या तोंडावर ऊसदराची भलतीच काळजी घेतलेली आहे. दुसऱ्या कारखान्याच्या तुलनेत ऊसदरात आपण कसे वरचढ ठरू याची जणू स्पर्धाच सोलापुरात पाहायला मिळत आहे. परिणामी जिल्ह्यातील सामान्य लोक ही शेतकऱ्यांची काळजी आहे की मतांची बेरीज, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. (Latest Political News)

सोलापूर हा साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला आहे. जिल्ह्यातील अनेक कारखानदार हे विविध राजकीय पदांवर आहेत. राज्यातील फुटीच्या राजकारणातून यातील बहुतेकांना विधानसभा किंवा लोकसभेचे वेध लागलेले आहेत. आता मागील गाळप हंगामात केलेल्या चुकांचा फटका आगामी निवडणुकांत बसू नये, याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसून येत आहे. यातूनच उसाला मीच उच्चांकी दर देतोय, हे दाखवण्यासाठी जिल्ह्यात जणू स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील अनेक कारखानदार हे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सध्या ऊसदराबाबत घोषणाबाजी करत आहेत. धर्मराज काडादी यांचा सिद्धेश्वर कारखाना २९०० रुपये, तर पंढरपूरच्या अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल कारखान्याने २५५० रुपये पहिल्या हप्त्याची घोषणा करून ऊसदराची कोंडी फोडली. ऊसदराची कोंडी फुटताच साखर कारखाना किंग असलेले आमदार बबनराव शिंदे यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे.

आमदार बबन शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने २७००, तर रणजीत शिंदे यांचा तुर्क पिंपरीचा आ. बबनदादा शिंदे शुगरनेही २७०० रुपये पहिल्या हप्त्याची घोषणा केली. यावर मात करत गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदेंनी २८०० रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. तर जय हिंद शुगरचे चेअरमन काकासाहेब माने देशमुख हे शेतकऱ्यांना २७०० रुपये पहिला हप्ता देणार आहेत. करमाळ्यात विक्रम सिंह शिंदे यांनी कमलाभवानी शुगरने २८००, तर आमदार संजय शिंदे यांचा विठ्ठल शुगर म्हैसगाव या करखान्याने २७०० रुपये पहिला हप्ता जाहीर केला. या दरात काही दिवसांत बदल होऊन वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाणकार सांगत आहेत.

जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसाची बिले हे तब्बल एक वर्षभर अदा केली नाहीत. त्याचबरोबर ऊस वाहतूकदारांची बिलेही अनेक कारखानदारांनी रखडवलेली आहेत. याचा संबंधित कारखानदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. या चुकांवर पडदा टाकण्याच्या दृष्टीने यंदा उच्चांकी दराबाबतच्या घोषणा सुरू झालेल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनेकांनी उच्चांकी २७००ते २८०० रुपये दर जाहीर केलेला आहे. मात्र, पुढील हप्ते किती रुपयांनी काढणार, असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करताना दिसत आहेत. (Maharashtra Political News)

दरम्यान, जिल्ह्यात प्रशांत परिचारक यांचा श्रीपूर येथील पांडुरंग कारखाना आणि आमदार बबनराव शिंदेंचा विठ्ठलराव शिंदे कारखाना दरवर्षी उच्चांक दर देतात. या स्पर्धेत यंदा जिल्ह्यातील सर्व कारखानदार उतरलेले आहेत. त्यामुळे यावर्षी निवडणुकांच्या तोंडावर कोणता कारखाना सर्वात जास्त दर देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

...तर चार हजार रुपये दर मिळेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकच निर्णय हा शेतकऱ्यांना उसाला प्रतिमेट्रिक टन चार हजार रुपये दर देऊ शकतो, असा जिल्ह्यातील कारखानदारांचा दावा आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये ११० देशांना भारत हा साखरेचा पुरवठा करतो. जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर हे भारतापेक्षा जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी साखरेची निर्यातबंदी उठवली तर कारखानदारांना शेतकऱ्यांना चार हजार रुपये प्रतिमॅट्रिक टन उसाला दर द्यायला काही अडचण येणार नाही, असे कारखानदारांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT