Mumbai, 23 February : तीळगूळ ठाण्याला पाठवा, हे जेव्हा मी ऐकलं, तेव्हा तुमच्या मनाला कुठली गोष्ट वाईट वाटली असेल तर दादा आज मरणानंतर तुम्ही मला माफ करू शकणार नाही. पण, एक माणूस म्हणून माझ्या मनातील भावना जाहीररित्या महाराष्ट्रासमोर व्यक्त करत असताना मी एवढंच म्हणेन की दादा माफ करा, काही चुकलं असेल. बोलण्याच्या ओघात मीही काही बोलून गेलो असेल, असे म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भर विधानसभेत हात जोडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, अजितदादा हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आगळे वेगळे व्यक्तीमत्व होते. पण मनातून अत्यंत इमोशनल होते. राज्य सहकारी बॅंकेच्या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघं राजीनामा देण्यासाठी गेलो, राजीनामा देत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले आश्रू आणि माझा पकडलेला हात ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. कोणाला काय म्हणायचे ते म्हणा. पण त्यांच्यावर झालेल्या खोट्यानाट्या आरोपामुळे ते प्रचंड व्यथित असायचे. त्यांना प्रचंड वाईट वाटायचे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) २००० ते २०१४ या काळात टीव्हीवर जाणारा एकमेव प्रतिनिधी मी होतो. त्यामुळे दादोजी कोंडदेव प्रकरणी आणि ७० हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप, एखादा शब्द चुकून गेला, त्याबाबतचा बचाव करण्यासाठी मी टीव्हीवर जायचो. बचाव व्यवस्थित झाला आहे, हे सांगण्यासाठी त्यांचा मला रात्री फोन यायचा, असे आव्हाड यांनी सांगितले.
ते म्हणाले, तडकाफडकी निर्णयासाठी ते परिचित होते. एकदा माझा आणि एकनाथ खडसेंचा वाद झाला. खडसे म्हणाले, इतका व्यस्त असणारा मंत्री तीन दिवसांत फाईलवर सही कसा काय करतो. त्यावर खडसेसाहेब तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय. तीन दिवसांत सही केली. अजितदादांनी त्याकडे पाहिलेला दिसत नाही. कारण त्यांच्या टेबलवर जास्तीत जास्त तीन तासांच फाईल राहू शकते, त्यापेक्षा जास्त वेळ राहूच शकत नाही. कुठलाही निर्णय घेताना ते पूर्ण वाचून घेत असत. फायलींचा ढिगारा त्यांच्याकडे लागला आहे, असं कधी झालंच नाही.
माझ्या शर्टाची वरची दोन बोटं उघडी असायची, त्यावरून ते जाहीररित्या मला ठोकायचे. अरे दोन बटन उघडी...मी म्हणायचो दोन बटन काय बघताय, आतला हृदय बघा आणि त्यात कोण आहे, ते बघा. हृदयात फक्त निष्ठा आहे. खरं सांगायचं तर २०१९ नंतर अजितदादा आणि माझ्यात थोडसं वितुष्ट आलं. पण ते वितुष्ट निष्ठेने आलं. त्यांच्याविरोधात माझं काहीच नव्हतं, असेही आव्हाड यांनी सांगितलं.
ते म्हणाले, जेव्हा एका महिलेने माझ्यावर आरोप केला आणि ३५४ गुन्हा दाखल झाला. तेव्हा सगळी कामं बाजूला ठेवून माझ्या घरी येणारे पहिले अजित पवार होते. तेव्हा ते मला म्हणाले होते, जितेंद्र हे खरं आहे की, खोटा आरोप झाला की त्रास आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला हेाता. बाकीच्यांना मजा असते. ३५४ गुन्हा साधा आहे, पण त्याचा त्रास तुला आणि तुझ्या पत्नीला काय होत असेल हे मी जानतो. त्यामुळे त्यांच्यातील मृदू स्वभाव मी जवळून अनुभवला आहे.
शरद पवारांशी बोलताना अजितदादा कधीही त्यांच्या डोळ्यात डोळ घालून बोलत नसत. पवारसाहेबांशी बोलताना ते दुसरीकडे बघायचे आणि बोलायचे. त्यांचं आणि साहेबांचं नातं वेगळं, ते नातं कदाचित महाराष्ट्राला कळणार नाही. प्रचंड आत्मीयता आणि प्रचंड प्रेम असणारा त्यांचा काकांबद्दलचा स्वभाव होता. हे मी जवळून अनुभवलं आहे, अशीही आठवण आव्हाड यांनी सांगितली.
ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मला एक व्हिडिओ आला. त्यात मकर संक्रांतीचा तीळगूळ देण्याची गोष्ट निघाली. दादा, तुम्ही तीळगूळ कोणाला द्यायल, असं विचारलं, तेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं नाही. पण मिश्किलपणे उत्तर दिले, हे तीळगूळ ठाण्याला पाठवा. दादा, आज तुम्ही नाहीत, खरं मनात असं कधीच नव्हतं की वाईट बोलावं. काही प्रसंग असे आले की काही भूमिका तुम्ही घेतल्या, काही मी घेतल्या. पण त्या कधीच व्यक्तिगत नव्हत्या. त्या वेगळ्या विचारधारेतून आणि भूमिकेतून आलेल्या होत्या. तुमचं मन दुखावावं आणि तुमचं मन दुःखी झालं असेल तर तो काळ आणि वेळ तशी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.