Manoj Jarange Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचे मोठे विधान

विश्वभूषण लिमये

Solapur, 31 August : राजकोट (मालवण) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यात राज्यात आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. या सर्व प्रकरणावर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या संदर्भात एक विधान केले आहे.

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली, हे खरं आहे. मात्र, त्यात आता राजकारण करू नये. असे प्रकरण परत होऊ नये, यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मालवणच्या राजकोटमध्ये उभारण्यात आलेला 35 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj statue ) कोसळला आहे, त्याची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मालवणला निघाले आहेत. मालवणला जाताना त्यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाष्य केले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मालवणमध्ये (Malvan) शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे, यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र, या प्रकरणी कोणीही राजकारण करू नका.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. शेवटी हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राजकारण करायला नेत्यांना खूप जागा आहेत. मात्र, या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका.

सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याला कायमचं आतमध्ये टाकलं पाहिजे. या प्रकरणी सर्वांनी राजकारण बंद करा; अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, टेंडर घेणारे लोक हे हरामखोर असतात, त्यांना कशात काय खावं तेही कळत नाही. हे टेंडरवाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील, मंदिर असतील, यात पण ते खातात. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही, तर आम्हाला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पुतळा प्रकरणी माफी मागितली आहे. त्यावर जरांगे यांनी यामध्ये उद्‌घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. घटना तर घडली आहे, त्यामुळे माफी मागितली काय अन नाही मागितली काय. पण, आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT