Sangli Sugarcane
Sangli Sugarcane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane Price in Sangli : सांगलीत 3175 रुपयांवर ऊस दराचा कंडका

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

Sangli News : मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न चिघळला होता. मात्र प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बोलाविलेल्या बुधवारच्या बैठकीत ऊस दराचा कंडका पडला. पहिली उचल प्रतिटन 3 हजार 175 रुपये विनाकपात देण्याचा निर्णय झाला.

तर दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांकडून 3100 रुपये देण्याबाबत स्वाभिमानी आणि कारखानदारांच्या बैठकीत तोडगा निघाला. आमदार अरुण लाड व प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे ऊस दराचा प्रश्न निकालात निघाला. मात्र या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी अनुपस्थित राहिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, आर. डी. माऊल, शरद कदम आर. डी. पाटील, संतोष कुंभार, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, बाबा संद्रे, अजित हलिगळे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उसदरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 16 डिसेंबरला बैठक झाली होती. यात गेल्यावर्षी 3 हजारांपेक्षा कमी पैसे दिलेल्या कारखान्यांनी 100 आणि 3 हजार दिलेल्यांनी 50 रुपये तसेच यावर्षी एफआरपी अधिक 100 रुपये द्यावे, अशी मागणी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. मात्र जिल्ह्यातील कारखान्यांनी हा पॅटर्न धुडकावला होता.

त्यानंतर स्वाभिमानीने साडेबारा टक्केपेक्षा जादा उतारा असणार्‍या कारखान्यांनी पहिली उचल 3 हजार 250 आणि साडेबारापेक्षा कमी उतारा असलेल्यांनी 3 हजार 200 रुपये देण्याची मागणी केली. मात्र कारखानदार अनुक्रमे 3 हजार 150 आणि 3 हजार 100 रुपयांवर ठाम राहिले. स्वाभिमानीने दिलेला नवा प्रस्तावही कारखानदारांनी अमान्य केला. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली होती. ठोस तोडगा न निघाल्याने कारखानदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे मुदत मागितली.

ही मुदत संपली होती. त्यामुळे दराची कोंडी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक बोलावली. या बैठकीत पहिली उचल 3 हजार 200 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानीचे महेश खराडे, संदीप राजोबा यांनी केली. मात्र कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

प्रशासनाच्यावतीने संघटना आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींना दोन पावले मागे घेण्याची विनंती केली. मात्र दोघेही आपल्या मतावर ठाम होते. त्यानंतर ‘तुम्ही विचार करून सांगा’असे सांगून संघटनेचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर आले.

प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे, आमदार लाड आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. पुन्हा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बोलविण्यात आले. त्यावेळी दुष्काळी भागातील कारखाने पहिली उचल विनाकपात 3 हजार 100 आणि इतर कारखाने 3 हजार 175 रुपये देण्याचा प्रस्ताव समोर आला. त्याला कारखान्यांच्या प्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सहमती दर्शविली. त्यामुळे दीड महिन्यापासून सुरू असलेला ऊस दराचा प्रश्न निकालात काढण्यात प्रशासनाला यश आले.

सात कारखान्यांचे प्रतिनिधी हजर ; शेट्टी गैरहजर

बैठकीला क्रांती, सोनहिरा, विश्वास, हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्यांच्या तीन युनिटचे प्रतिनिधी असे सात कारखान्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. माजी खा. राजू शेट्टी बैठकीला उपस्थित नव्हते. कोल्हापुरातील कोर्टात तारीख असल्याने ते हजर नसल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

समाधानी नाही ; मात्र 175 वाढवून मिळाले - महेश खराडे

झालेल्या निर्णयाबाबत आम्ही शंभर टक्के समाधानी नाही. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अनेक भागातील हजारो एकर ऊस शेतात उभा आहे. अगोदरच पाऊस कमी झाल्याने उसाची वाढ चांगली झाली नाही.

वेळेत ऊस गाळप होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही दोन पावले मागे घेतली. मात्र यापूर्वी कारखाने 3 हजार दर देत होते. मात्र आमच्या आंदोलनामुळे 175 रुपये प्रतिटन वाढवून मिळाले आहेत, हे आंदोलनाचे यश आहे, असे माहिती जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि राजोबा यांनी दिली.

आमदार लाड, धोडमिसे यांची यशस्वी शिष्टाई

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपली आहे. त्यांनी पदभार घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी उसदराची बैठक घेतली. या बैठकीला आमदार अरुण लाड उपस्थित राहिले. या दोघांच्या यशस्वी शिष्टाईमुळे गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकालात निघाला.

असा मिळणार कारखान्यांकडून दर

जिल्ह्यात सहा कारखाने देणार 3 हजार 100 तासगाव तुरची, भारती (नागेवाडी), श्री ( राजेवाडी), राजारामबापू (जत), श्रीपती शुगर डफळापूर), डोंगराई (रायगाव) हे सहा दुष्काळी पट्ट्यातील कारखाने प्रतिटन पहिली उचल एकरकमी 3 हजार 100 रुपये देतील. राजारामबापू साखराळे, वाटेगाव युनिट, सर्वोदय कारंदवाडी, क्रांती कुंडल, विश्वास शिराळा आणि सोनहिरा वांगी हे कारखाने 3 हजार 175 रुपये प्रतिटन एकरकमी देतील.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT