Sugar Factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane Rate: सोलापूरमध्ये ऊसदराची स्पर्धा; सिद्धेश्वर कारखाना देणार 3200 रुपयांचा दर

Anand Surwase

Solapur News: यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण होत आहे, परंतु यंदा उसाचा तुटवडा जाणवत असल्याने गाळप हंगाम यशस्वीपणे चालावा म्हणून ऊस मिळण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धाच लागली आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकतेच शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन 3 हजार 200 रुपयांपर्यंत दर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर साखर सम्राटांची मात्र अडचण झाली आहे.

सोलापूर जिल्हा हा सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदाच्या गाळप हंगामामध्ये जिल्ह्यात तब्बल 38 साखर कारखान्यांनी गाळपाचा परवाना घेत गाळपास सुरुवात केली. मात्र, यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे ऊस पिकाची म्हणावी तशी वाढ झाली नाही.

तसेच अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी उसाची विक्री केली आहे. त्यामुळे यावर्षी कारखान्यांना गाळपासाठी उसाचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे गाळपासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याला ऊस घालावा, यासाठी साखर कारखानदारांकडून जादा ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यात बहुतांश कारखान्यांकडून 2800 चा दर

सोलापूर जिल्ह्यात बहुतांश साखर कारखानदारांनी टनाला 2500 ते 2800 रुपयांचा दर जाहीर केला. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याने 2550 रुपयांचा दर जाहीर करत ऊसदराची कोंडी फोडली होती. मात्र, कारखानदारांची यामध्ये अडचण झाली होती. त्यानंतर परिचारक यांच्या पांडुरंग कारखान्याने 2800 रुपये दर देण्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर पुन्हा एकदा अभिजित पाटील यांनी नोव्हेंबरमध्ये गाळपास येणाऱ्या उसाला 2825, डिसेंबरमध्ये - 2850 , जाने - 2900, फेब्रुवारीमध्ये 2950 आणि मार्चमध्ये येणाऱ्या उसाला 3000 रुपयांचा दर देण्याची घोषणा केली. दरम्यान, जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे, लोकमंगल, भीमा, सिद्धनाथ, जयहिंद , जकराया यासह इतर कारखान्यांनी आधी जाहीर केलेल्या दरात वाढ करत उसाचे दर 2800 पर्यंत नेले आहेत.

सिद्धेश्वर देणार सर्वाधिक 3200 रुपयांचा दर

दरम्यान, विमानतळाला अडथळा ठरणाऱ्या चिमणी पाडकाम प्रकरणी चर्चेत आलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2750 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला. त्यानंतर डिसेंबरमध्ये गाळपास येणाऱ्या उसाला 2900 रुपये, जानेवारीसाठी 3000, तर फेब्रुवारीमध्ये 3100 आणि मार्चमध्ये गाळपास येणाऱ्या उसाला 3200 रुपयांचा दर देणार असल्याचे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धर्मराज काडादी यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांचा फायदा

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होणार नाही, याची साखर सम्राटांकडून काळजी घेतली जात आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यात यंदा उसाचा तुटवडा यामुळे साखर सम्राटांकडून यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फायदा होताना दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या उसाचीही म्हणावी तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडून ऊस घालण्याची घाई केली जात नाही. त्यातच यंदा गाळप हंगाम तीन महिनेच चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालवा, यासाठी जास्तीचा ऊसदर देऊन ऊस मिळवण्यासाठीही कारखानदारांची स्पर्धा लागली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT