Tanaji Sawant News
Tanaji Sawant News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant News : आरोग्यमंत्री सावंतांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाची 'होऊ दे चर्चा'...! खासदार ओमराजेंनीही साधलं 'टायमिंग'

आनंद खर्डेकर

Dharashiv : एकनाथ शिदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार तर कोसळलेच शिवाय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. यानंतर शिवसेनेतील शिंदे गट - ठाकरे गटातला संघर्ष दिवसागणिक चढताच राहिला.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींसह एकमेकांना दोन्ही गटांकडून टार्गेट करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यातच शिंदेंच्या बंडात मोलाची भूमिका बजावणारे तानाजी सावंत हे ठाकरे गटाकडून कायम निशाण्यावर राहिले आहेत. यातच आता आरोग्यमंत्री डॉ. सावंतांना बालेकिल्लातच घेरण्यासाठी ठाकरे गटाने मोहीम उघडली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या डॉ. तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांच्या भूम-परंडा मतदारसंघात ठाकरे गटाकडून 'होऊ दे चर्चा' हा कार्यक्रम धडाक्यात राबविण्यात आला. त्यानुसार गावोगावी जाऊन राज्य सरकार आणि पालकमंत्री सावंत यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar) यांनी मात्र राज्य सरकारच्या कारभारावर जास्त टीका केली.

महाराष्ट्रातील सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री डॉ. सावंत यांचा हा मतदारसंघ असल्याने हा ठाकरे गटाने कार्यक्रम ठळकपणे राबवला. जिल्ह्यातील अन्य ठिकाणी या कार्यक्रमाची जोरदार अशी चर्चा झाल्याचे दिसून आले नाही. सुरुवातीला साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात पाय रोवणाऱ्या सावंत यांनी राजकारणाच्या माध्यमातून ते आणखी घट्ट रोवले. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व पालकमंत्री डॉ. सावंत यांचे राजकीय संबंध मागील काही दिवसांपासून बिघडलेले आहेत.

पालकमंत्री डॉ. सावंत यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे नेतृत्व नाकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार पाटील यांनी ठाकरे गटात राहणेच पसंत केले. त्यानंतर नेतृत्वाने पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देत पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या विरोधात बळ दिले.

जिल्हाप्रमुख पाटील यांनी परंडा, भूम, वाशी, कळंब येथे राज्य सरकारच्या कारभाराविरोधात रान उठवले. खासदार ओमराजे निंबाळकर हेदेखील अनेक ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सरकारच्या कारभारावर ते टीका करत आहेत. ज्ञानेश्वर पाटील यांचे कार्यकर्ते सरकारसह पालकमंत्री सावंत यांच्यावरही आक्रमकपणे टीका करत आहेत.

सरकारच्या योजना बोलघेवड्या आहेत, भूलथापा आहेत असे सांगताना सरकारच्या कारभारापेक्षा जास्त पालकमंत्री डॉ. सावंत यांच्यावर पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी आरोप करत आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, नाशिक संपर्कप्रमुख तथा धाराशिव लोकसभा मतदारसंघ निरीक्षक दत्तात्रय गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, परंडा शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, शहर प्रमुख रईस मुजावर यांनी मतदारसंघातील अनेक गावांत हा कार्यक्रम घेतला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT