raju shetti sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : चळवळ टिकवण्याचं शेट्टींसमोर आव्हान, सततच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे शिलेदार दुरावले

Rahul Gadkar

Raju Shetti News : 2014 ते 2024 च्या कार्यकाळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सततच्या बदलत जाणाऱ्या भूमिकेमुळे बिनीचे शिलेदारासह कार्यकर्ते चळवळीपासून दुरावले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांची नाळ दिवसेंदिवस या मागील काही वर्षांपासून राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकेमुळे बदलत असल्याचे चित्र आहे. त्याचा प्रत्यय मागील दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होमग्राऊंड असलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात त्याचा प्रत्यय दिसून आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाळ जुळलेले बिनीचे शिलेदार देखील आता चळवळीपासून दूर होत असल्याचे चित्र आहे. याची खंत ही अनेकांनी बोलून दाखवल्या आहेत.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चळवळची भूमिका ठेवून सामोरे गेल्यानंतर राजू शेट्टी हे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी घरोबा करून हातकणंगलेतून पुन्हा एकदा विजय मिळवला. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काय पडलं ही भावना घेऊन त्यांनी भाजपशी काडीमोड करत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी (NCP) मैत्री केली. या मैत्रीचा फटका त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बसला. शिवाय विधानसभा निवडणुकीची राज्यातून केवळ एका जागेवरच त्यांना विजय मिळवता आला.

शेट्टी यांची भूमिका सातत्याने बदलत गेल्याने त्याचा परिणाम शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे होत आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जाण्यावरून मतप्रवाह पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाने शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्ती यांच्यासमोर ठेवली होती. मात्र स्वाभिमानाने शेट्टी यांनी आपली भूमिका ठाम ठेवत स्वतंत्र लढण्यावर भर दिला.

त्याचा फटकाही या निवडणुकीत बसला. एके काळी सहा लाख मते घेणाऱ्या राजू शेट्टी यांना या लोकसभा निवडणुकीत केवळ दीड लाख मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून शेट्टी यांची ओळख झाली. सातत्याने एकमुखी भूमिका घेत शेट्टी यांना साध्य काय करायचं आहे? अशी विचार ना काही जवळचे कार्यकर्ते करतानाच दिसत आहेत. त्यामुळे राजकीय बदलत्या भूमिकेचा परिणाम कार्यकर्त्यांसह शिलेदारांवर होत आहे. काही जणांनी तर केवळ तुम्ही हाक द्या त्यावेळीच आम्ही येतो. असा निरोप धाडल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मी निवडणुकीला का उभारलो असे स्पष्ट करत असताना माझं काय चुकलं अशी भावनिक पोस्ट शेट्टी यांनी समाज माध्यमांवर केली होती. शेट्टी यांनी सातत्याने निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

भाजपचा पराभव हे दोघांचेही ध्येय असताना शेट्टी यांनी निवडणुकीत आघाडीला पाठिंबा द्यावा. असे अनेकांचे म्हणणे होते. मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानंतर शेवटी ही रिंगणात उभारले. त्याचा फटका महाविकास आघाडीला देखील बसला. विजयाचे दावेदार समजले जाणारे सत्यजित पाटील सरूडकर यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला. त्यांच्या पराभवासाठीच शेट्टी निवडणुकीला सामोरे गेले का अशी विचारणा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत.

सलग दोन पराभवानंतर कार्यकर्ते देखील द्विधा अवस्थेत आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य आणण्यासाठी शेट्टी यांच्यासमोर आव्हान आहे. नवचैतन्य निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असावी, याबाबतीत प्रत्येकाचे मत जाणून घेतले जाणार आहे. स्वबळावर लढायचे की महायुती- महाविकास आघाडी यांच्यासोबत जायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सध्या तरी दुरावलेल्या कार्यकर्त्यांना गोळा करण्याचे काम शेट्टी यांच्यासमोर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT