Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

...तर २०२४ मध्ये सतेज पाटील कोल्हापूर उत्तरचे उमेदवार असतील : फडणवीसांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : जयश्री जाधव (jayshree Jadhav) यांच्याशी आमची कोणतीही दुश्मनी नाही. आम्ही त्यांना विरोधदेखील करत नाही. आमची लढाई या माऊलीशी नाही. त्या माउलीच्या मागे जे दडलेले आहेत, त्यांच्याशी आमची लढाई आहे. त्यांच्या मनात काय आहे, हे मला माहिती आहे. आज त्यांनी जयश्री जाधवांना पुढे केले आहे. त्यांच्या नावाने ही जागा निवडून आणता आली तर २०२४ च्या निवडणुकीत या माऊलीच्या मागे दडलेले पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) कोल्हापूर उत्तरचे उमेदवार असणार आहेत. भगव्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून या मतदारसंघातून ते लढताना दिसणार आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केला. (... then in 2024, Satej Patil will be the candidate from Kolhapur North: Fadnavis)

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार संजय पाटील, विनय कोरे, प्रकाश आवाडे, हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज देशमुख आदी इतरही अनेक नेते उपस्थित आहेत.

सत्यजित कदम निवडून आले तर काय करणार. ते विरोधी पक्षाचे आहेत, असे विरोधकांकडून सांगितले जाते. पण तुम्ही काय केले, असा सवालही फडणवीस यांनी पाटील यांना केला. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर ही दक्षिण काशी आहे. काशिविश्वेरच्या विश्वनाथावर जो कलंक होता, तो मोदी यांनी काढला आहे. पंचगंगा नदीचे पाणीसुद्धा निर्मल असेल, तेही काम मोदीच करू शकता. तुम्ही आम्हाला नाना द्या, मी तुम्हाला पंचगंगा देतो.

‘काश्मीर फाईल्स’चीही यांना अ‍ॅलर्जी

शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. दरवेळी यायचो, तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज हिंदुत्त्वाचे नामोनिशाण येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते. पण, भगव्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मैदानात आहे. ही संधी गेली तर पुन्हा येथे भगव्याचे दर्शन होणार नाही. ही लढाई व्यक्तीची नाही, तर विचारांची आहे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी ३७० रद्द करण्याला विरोध केला, आपल्याला त्यांना पराभूत करायचे आहे. यांना तर ‘काश्मीर फाईल्स’चीही अ‍ॅलर्जी आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गोकुळच्या निवडणुकीत मृत्युमुखी पडलेल्यांची जबाबदारी कोणाची?

कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न होता. एका झटक्यात आम्ही तो सोडवला. इथल्या पाण्याचा प्रश्न असो की विमानतळाचा, प्रत्येक विषय आम्ही सोडविला. कोल्हापुरात पूर आला, तेव्हा आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत ही येथील लोकांच्या स्मरणात आहे. तुमच्यात देण्याची दानतच नाही. तुम्ही फक्त घरं भरण्याचे काम केले. गोकूळची निवडणूक होईपर्यंत लॉकडाऊन लागू दिला नाही. निवडणूक होताच लागू केला. त्याकाळात ज्यांचे मृत्यू झाले, त्याचे उत्तर कोण देणार?सारेच्या सारे १०० कोटींच्या वसुलीत मग्न आहेत, असाही आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.

महाआघाडीला दारुवाल्यांचा पुळका

फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्रात सरकार नाही, तर केवळ भ्रष्टाचार आहे. सामान्य माणूस होरपळत असताना त्याला कोणतीच मदत दिली नाही. यांना पुळका दारूवाल्यांचा आला. दारु विकणाऱ्यांना सवलती दिल्या आणि पिणाऱ्याला ती खुली करून दिली. दुसरीकडे, भाजपाशासित राज्याने पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक कमी केले. हे सरकार ५२ रुपये प्रतिलिटर आपल्या खिशात टाकतात. पण, भाव कमी करावा वाटत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT