Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde News : '....म्हणूनच शिंदे-फडणवीस महापालिका, झेडपीच्या निवडणुका घेण्याचे धाडस करत नाहीत'

सरकारनामा ब्यूरो

Solapur News: भाजप सरकारच्या कारभाराबाबत जनतेत जागृती होत आहे, त्यामुळेच पोटनिवडणुकीत ‘खोके सरकार’चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अख्ख्या मंत्रिमंडळाने प्रचंड पैसा वापर करत प्रचार यंत्रणा राबवूनही बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. बाकी ठिकाणीसुद्धा त्यांची संख्या कमी झाली असून मतांची टक्केवारी घटली आहे. आपल्या बाजूला जनाधार नाही; म्हणूनच शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलत आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. (Therefore, Shinde-Fadnavis are postponing local body elections : Praniti Shinde)

सोलापूर शहरातील जुना प्रभाग क्रमांक १८ व २० नागेंद्र नगर, स्वागत नगर रोड येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाची बैठक, तसेच महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, साडी आणि ई-श्रम कार्डचे वाटप आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, सेवादलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. रेशनवर धान्य मिळत नाही. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे, नोटबंदी, GST मुळे उद्योगधंदे बंद पडत आहेत. धार्मिक उन्माद पैदा केला जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. नवीन कायदे आणून यंत्रमाग, वीडी उद्योगाला, बांधकाम कामगारांना त्रास दिला जात आहे. या विरोधात काँग्रेस पक्ष आणि विरोधक लढत आहेत.

राहुल गांधी यांनी जनतेत जाऊन लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. हळूहळू जनतेत जागृती होत आहे; म्हणून परवाच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अख्ख्या मंत्रिमंडळाने प्रचंड पैसा वापरून प्रचार यंत्रणा राबवूनही भाजपचा पराभव झाला. इतर ठिकाणीसुद्धा भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

भाजपच्या कारभाराला जनता वैतागली आहे. लोकांना कळून चुकले आहे की भाजपचे लोक फसवे आहेत. गोरगरीब, कामगार, महिलांचा, सर्वसमान्यांचा एकच वाली तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसमान्यांचा विचार करून काम करतो. महिलांना आदर, सन्मान देणारा काँग्रेस पक्ष आहे आणि आमच्यावर विश्वास आहे; म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमास उपस्थित आहात, असेही शिंदे म्हणाल्या.

कार्यक्रमास रियाजभाई हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, परवीन ईनामदार, महिला शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, माजी नगरसेवक एन. के. क्षीरसागर, हारून शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT