आमदार उत्तम जानकर यांनी सोलापूरच्या पालकमंत्र्यांवर आणि भाजप नेत्यांवर मतदारांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला.
त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत निर्णय प्रक्रियेत गोंधळ, गैरव्यवहार, आणि पोलिसांच्या मदतीने पैसे वाटल्याचे म्हटले.
जानकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून दोन दिवसांत निकाल लावावेत, अन्यथा लोकशाही धोक्यात येईल असा इशारा दिला.
Solapur, 05 December : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, ‘कोण भाजपच्या विरोधात आहे. कोण भाजपच्या विरोधात प्रचार करतोय, कोण विरोधात मत देतोय, त्याची फक्त चिठ्ठी पाठवा. त्याचा थेट कार्यक्रम लावतो, अशी धमकी दिली होती. काय चालू आहे हे. मतदारांवर प्रचंड दबाव आणला गेला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला.
उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत भयानक चित्र राज्याने पाहिले आहे. कोणाचा पायपूस कुणालाही नव्हता. निवडणूक आयोगाला काय करावं, हेच समजत नव्हतं. आयोगावर अशा लोकांची नेमणूक कोण करतंय. तो झोकांट्या खातोय कि भेलकांडतोय, हे राज्याला समजनासे झाले आहे. कोणाची निवडणूक कधी थांबवतोय आणि कधी सुरू करतोय, याचा थांगपत्ता नव्हता.
निवडणूक आयोग कोणाच्या दहशतीखाली काम करतोय. ह्या सर्व यंत्रणेला कोण दाबून ठेवतोय, त्यांच्यावर कोणत्या अज्ञात शक्तीचा जोर आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात कोणी पुरुषांनी निवडणूक लढवायची नाही, बाराच्या बारा नगराध्यक्ष हे भाजपचेच असले पाहिजेत. महायुतीमधील मित्रपक्षांनीही विरोधात उभं राहायचं नाही, असं भाजप नेत्यांचं सोलापुरात वागणं होतं. म्हणजे या ठिकाणी बायकांना निवडणुका लढवाव्या लागल्या. कारण ते फार्मच भरू देत नव्हते. क्युआरटी पथक घेऊन फार्म भरावे लागले. कसले हे पादर्शकतेचे प्रमाण आहे, असा सवाल जानकर यांनी केला.
जानकर म्हणाले, एकावर अन्याय करायचा, दुसऱ्याला पैसे वाटायची परवानगी द्यायची. पोलिसांच्या गाड्यांनी पैसे वाटायचे. हा काय प्रकार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगेल त्या पद्धतीने निर्णय द्यायचे. त्या उद्रेकातून राज्यभर राडे झाले. लोकांनी ईव्हीएमच्या मशीन फोडल्या.
सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाची न्यायालयाची किव आली आहे. हे सर्व आता संपलं आहे. सर्वत्र काळोख निर्माण झाला आहे. केवळ आता ह्या महिला लढल्या तरच दे राज्याला वाचवू शकतात. पुरुषांनी, कुठल्या आमदारांनीही निवडणूक लढवायचीच नाही. ही कसली दहशत आहे? त्यांचा कोणी कार्यकर्ता नगराध्यक्ष करायचाच नाही. मग कशाला तुम्ही पेट्या मांडता? तुम्हाला पाहिजे तो निकाल करून घेता, हा तमाशा कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
आमदार जानकर म्हणाले, राज्यात जो आक्रोश आहे, तो राज्य सरकारची इज्जत घालवणारा आहे. हा बेधुंद झालेला आणि कोलमडत चालेला निवडणूक आयोग राज्यातील जनतेने पाहिलेला आहे. एकतर आठ ते नऊ वर्षांनंतर निवडणूक होत आहेत आणि त्याची ही अवस्था. सत्ताधारी सरकारच म्हणतंय आम्हाला हे आवडलं नाही. मग हे करायला कोण सांगतय? हे केलंय कोणी? तिथं बसवलेले अधिकारी तुमचं सोडून इतर कोणाचं ऐकतात? ही निवडणूक आयोगाची नव्हे तर राज्य सरकारची इज्जत वेशीवर टांगली आहे.
....अन्यथा अनर्थ अटळ
सर्वोच्च न्यायालयात जाऊन नगरपालिकेचे निकाल दोन दिवसांत लावा. तुम्हाला हे करायचं नसेल तर देशात राजेशाही आणि हुकुमशाही एकत्र येते की काय अशी धास्ती जनतेच्या मनात आहे. लोकशाही जीवंत ठेवा; अन्यथा अनर्थ अटळ आहे, असा इशाराही उत्तम जानकर यांनी दिला.
उत्तम जानकर यांनी काय आरोप केले?
त्यांनी भाजप नेत्यांनी मतदारांना धमक्या दिल्या आणि निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केला असा आरोप केला.
निवडणूक आयोगावर काय टीका करण्यात आली?
आयोग पक्षपातीपणे वागला आणि निर्णय प्रक्रियेत गोंधळ निर्माण केला असा आरोप आहे.
सोलापूरमध्ये महिला उमेदवारांबाबत काय घडले?
पुरुष उमेदवारांना फार्म भरू न देता जबरदस्तीने महिलांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा आहे.
जानकर यांनी न्यायालयाकडे काय मागणी केली?
नगरपालिका निकाल दोन दिवसांत जाहीर करण्याची मागणी करत लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.