Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : महायुतीच्या दोन बड्या नेत्यांसमोर जयंतरावांचे सूचक विधान; ‘वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, कोणाला शरण जात नाही...’

Jayant Patil's suggestive statement : कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर केल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचेही आभार मानले.

Vijaykumar Dudhale

Sangli, 16 August : आमच्या वाळवा तालुक्याचा एक प्राब्लेम आहे. सहजासहजी हा तालुका वाकत नाही, सहजासहजी कोणाला शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहेत, त्यांना सोबत घेऊन लढायचं, हे आम्हाला एन.डी. पाटील यांच्यापासून सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी शिकवले आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देणारा हा इशारा आहे की काय अशी चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याचा इतिहास सांगताना व्यासपीठावर महायुतीचे दोन बडे आणि जबाबदार नेते असताना त्यांना दिलेला सूचक इशारा मानला जात आहे. त्यामुळे जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे मानले जात आहे.

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एन. डी. पाटील विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील, जयंत पाटील, रामशेठ ठाकूर, रोहित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यासंमोरच सूचक विधान केल्याने त्याला महत्व आहे.

जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील एखादा विद्यार्थी खंडपीठाच्या न्यायाधीशपदी बसेल, असं आपलं स्वप्न आहे. वाळवा तालुक्यातील विधी महाविद्यालयास आपण एन. डी. पाटील यांचे नाव देतोय, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी फार मोठी आहे. एन. डी. पाटील यांचे जे व्यक्तिमत्व होते, ते वाळवा तालुक्याचा स्वभाव सांगणारे होते.

मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की, हा वाळवा तालुका फार स्वाभिमानी तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथ नायकवडी, बाबूजी पाटणकर, बरडे गुरुजी, पांडू मास्तर या आणि इतर अनेक स्वातंत्र्यसैनिक वाळवा तालुक्यातील होते. या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीशांशी संघर्ष करताना कधी माघार घेतली नाही. या तालुक्याचे हे सर्वांत मोठे वैशिष्टय आहे. कदाचित संपूर्ण भारतातील सर्व तालुक्यांपेक्षा वाळवा तालुका वेगळा आहे, असे मी मानतो, असेही जयंतरावांनी स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले, लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकाराने करायची, हे एन. डी. पाटील यांनी दाखवून दिले आहे. हा या तालुक्याचा आदर्श आहे. हा आमच्या वाळवा तालुक्याचा प्राब्लेमही आहे. सहजासहजी हा तालुका वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहेत, त्यांना सोबत घेऊन लढायचं, हे एन.डी. पाटील यांच्यापासून सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी आम्हाला शिकवले आहे. हा आमचा प्राब्लेमही आहे आणि आमच्या स्वाभिमानाचे केंद्रही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT