NCP News : धाराशीव राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर ? अजित पवार भाकरी फिरवणार? की जुनाच चेहरा देणार..
धनंजय शेटे
Dharashiv Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशीव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. माजी आमदार राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशानंतर आता जिल्हाध्यक्ष पदाच्या नेमणूकीसाठी काही नावांवर खल सुरू आहे. अजित पवार धाराशीवमध्ये भाकरी फिरवणार की मग जुन्याच चेहऱ्यावर विश्वास दाखवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आमदार विक्रम काळे ,माजी आमदार राहुल मोटे, सुरेश पाटील ,सुरेश बिराजदार यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी 30 जून रोजी राजीनामा दिला होता. तेव्हापासून रिक्त असलेल्या या पदावर नियुक्ती देण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना निधी दिला नसल्याच्या कारणाने जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र मला दोन वर्ष पूर्ण झाले असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी मी राजीनामा दिला असल्याचे, त्यांनी माध्यमांना सांगीतले.
परंतु पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळेच धुरगुडे यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जाते. 21 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे धाराशिव (Dharashiv) जिल्हा दौऱ्यावर आले असताना कोणत्याही प्रकारचा पक्षांतर्गत वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते . धुरगुडे यांचा राजीनामा आला आहे, मात्र त्याच्यावर विचार झालेला नाही. पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले होते. पुढील काळामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका असल्याने जिल्हाध्यक्ष निवड लवकरच होणार आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी शिक्षक आमदार आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, सुरेश बिराजदार, सुरेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. या पैकी कोणाच्या खांद्यावर पक्षाची धुरा दिली जाते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. माजी आमदार राहुल मोटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये रस्सीखेच आहे . परंडा मतदारसंघातील माजी आमदार राहुल मोटे यांनी तीनवेळा आमदार म्हणून भूम-परांडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मोटे की बिराजदार?
धाराशीव जिल्ह्यात कामाचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क असल्याने त्यांनाच आगामी निवडणुकांसाठी अध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. चारवेळा निवडून आलेले मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनाही मोठा अनुभव असून त्यांनाही संधी मिळू शकते. पण मंत्रीपदाची इच्छा बाळगून असलेले काळे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारतील का? हा खरा प्रश्न आहे. सुरेश पाटील हे प्रदेश सरचिटणीस आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धाराशीव जिल्ह्यात सर्वप्रथम अजित पवार समर्थकांचा मेळावा त्यांनी घेतला होता.
धाराशीव जिल्ह्यात पक्षाची पूर्ण ताकद अजित पवार यांच्या पाठीशी उभी करत त्यांनी विश्वास संपादन केला होता. अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. अजित पवार यांचा सहकार आणि साखर कारखानदारीतील अनुभव, त्यांची आवड लक्षात घेत या क्षेत्रातही सुरेश पाटील पारंगत आहेत. धाराशिव जिल्ह्यात त्यांनी दोन साखर कारखाने व बिड जिल्ह्यात एक असे तीन कारखाने उभारले आहेत.
अजित पवारांशी असलेले त्यांचे संबंध, साखर कारखानदारीच्या माध्यमातून जिल्ह्यात असलेला जनसंपर्क आहे. शिवाय पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात सुरेश पाटील यांचा सक्रीय सहभाग असतो. या सर्व जमेच्या बाजू पाहता सुरेश पाटील यांच्या नावाला पसंती मिळू शकते, असेही बोलले जाते. बिराजदार यांनी मागील काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.