vitthal sahakari sakhar karkhana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : कुठेही वजन करून आणा, ऊसदर २८२५ रुपये प्रतिटन; विठ्ठल कारखान्याचा पॅटर्न राज्यभर चर्चेत

Sachin Fulpagare

Vitthal Sahakari Sakhar Karkhana News : पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन २ हजार ८२५ रुपये अशी जिल्ह्यातील सर्वाधिक पहिली उचल जाहीर केली आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे कुठल्याही काट्यावर वजन करून ऊस आणावा, असे आवाहनही शेतकऱ्यांना केले आहे.

एक तर सर्वाधिक उचल जाहीर केली शिवाय कारखान्याच्या वजन काट्याची हमी देऊन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आपला वेगळाच पॅटर्न निर्माण केला आहे. सोलापूर जिल्ह्यात या पॅटर्नची चर्चा रंगली आहे.

शनिवारी गुरसाळे ( ता.पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामातील १ लाख साखर पोत्यांचे पूजन चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या हंगामात १७ दिवसात १लाख ३८ हजार ७४० टन उसाचे गाळप केले आहे. तर एक लाख क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. यावेळी पाटील यांनी गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल २८२५ रुपये प्रतिटन जाहीर केली. यापूर्वी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी पाटील यांनी २५५० रुपये उचल जाहीर करून ऊस दराच्या शर्यतीला तोंड फोडलं होते.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २७०० रुपये तर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्याने पहिली उचल २८०० रुपये जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील यांनी ऊस दराच्या शर्यतीत पुढे धाव घेऊन नोव्हेंबर महिन्यात गाळप होणाऱ्या उसाला २८२५ रुपये, डिसेंबर महिन्यातील उसाला २८५० रुपये, जानेवारी महिन्यातील गाळप उसाला २ हजार ९०० तर फेब्रुवारी महिन्यात २ हजार ९५० रुपये, मार्च महिन्यात येणाऱ्या उसाला ३००० रुपये उचल देण्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली.

अभिजीत पाटलांनी ऊस दराची स्पर्धा निर्माण केली

सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सर्व साखर कारखानदार एकत्र बसून किती ऊस दर द्यायचा हे ठरवायचे आणि त्यानुसार सर्वांच्या सोयीने उसाला पहिली उचल आणि अंतिम भाव द्यायचे. परंतु गेल्यावर्षी अभिजीत पाटील मोळी टाकतानाच उसाचा भाव २ हजार ५०० रुपये टन जाहीर केला आणि त्यानुसार पैसेही दिले.

इतर साखर कारखान्यांना स्पर्धात्मक दर द्यावा लागला. या हंगामातील अभिजीत पाटील यांनी सुरुवातीला २५५० रुपये दर जाहीर केला. नंतर इतर कारखान्यांनी कुणी २६०० तर कुणी २७०० जाहीर केला. यंदा ऊस कमी असल्याने जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी साखर कारखानदारांना जास्तीचा दर द्यावा लागणार आहे. त्यामुळे पहिली उचल २८०० पर्यंत पोहोचली होती. त्यावरही कडी करत अभिजीत पाटील यांनी २८२५ रुपये दर जाहीर केला आणि कुठेही वजन करून आणा, असेही आवाहन करून इतर साखर कारखानदारांची कोंडी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT