Ramesh Baraskar-Baliram Sathe
Ramesh Baraskar-Baliram Sathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘राष्ट्रवादीची कार्यकारिणीही निवडू न शकलेल्या बळिराम साठेंनी दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान शिकवू नये’

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समुद्र आहे, ‘पक्षश्रेष्ठींनी वेळीच विचार करावा; अन्यथा पुन्हा पश्चातापाची वेळ येईल’ असा इशारा देण्यापेक्षा आपली निष्ठा तपासावी. राष्ट्रवादी हा तुटक्या, फुटक्या, रंजल्या गांजल्याला ताकद देणारा पक्ष आहे. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून साधी कार्यकारिणीही निवडली नाही, त्यांनी इतरांना ब्रह्मज्ञान शिकवू नये. समुद्रातून तांब्या भरून घेतला तर काय फरक पडणार आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांच्यावर नाव न घेता केली. (What district president Baliram Sathe did for the growth of NCP : Baraskar)

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे एक ऑगस्ट रोजी तालुक्यातील निवडून आलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता ‘श्रेष्ठींनी पक्षातील तुटक्या लोकांना ताकद दिली. त्या मागे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात त्यांच्या डोक्यावर असल्याचा आरोप साठे यांनी केला होता. त्या वेळी आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे आदींसह बहुसंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. त्याचा खरपूस समाचार प्रदेश चिटणीस बारसकर यांनी घेतला.

बारसकर म्हणाले, दुसऱ्याला नावे ठेवण्यापेक्षा साठे यांनी आपल्या कार्यकाळात आपण काय दिवे लावले, याचे आत्मपरीक्षण करावे. पक्षवाढीसाठी काय केले, केंद्राच्या जीएसटीसारख्या अन्यायाविरोधात कुठे आंदोलने केली. पक्ष किती वाढला. पक्षाचे किती कार्यक्रम राबविले, याचा विचार करावा. अशा निष्क्रीय लोकांनी दुसऱ्याची मापे काढू नयेत. पक्षाने केवळ प्रस्थापितांनाच ताकद द्यावी व इतरांची पिळवणूक करायची, हे डोक्यातून काढावे. माढा तालुक्यात बबनदादांना कुठल्या गटबाजीचा त्रास आहे. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये बळीराम साठे यांना कुठल्या गटबाजीचा त्रास आहे, हे पडताळावे. केवळ आणि केवळ चुकीच्या पद्धतीने माया गोळा केली व त्या चुका झाकण्यासाठी कुणावर तरी आरोप करून पक्षांतर करायचे, हे योग्य नाही. जनता हे न समजण्याइतपत दूधखुळी नाही.

मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने म्हणाले की, राजकारणात टीका टिप्पणी कायम होत असते, ते कायमच चालू राहणार आहे, परंतु ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या वयोमानाचा विचार करून असंसदीय भाषा वापरू नये, ती त्यांनाच घातक आहे, असा इशाराही साठे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT