<div class="paragraphs"><p>Mahesh Landge</p></div>

Mahesh Landge

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आमदार लांडगेंनी दिल्लीत दंड थोपटले...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : बळीराजा तथा बैलगाडा मालक, बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) शौकीन आणि ती पुन्हा सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या दहा वर्षाच्या लढ्याला अखेर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गुरुवारी (ता.16 डिसेंबर) यश आले. तीन विरोधी कायद्यांविरोधात गेले वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे नुकतेच केंद्र सरकार झुकले. त्यांनी हे कायदेही मागे घेतले. त्यांनतर हा बळीराजाचा काही दिवसांतच आणि तो ही सर्वोच्च न्यायालयात झालेला दुसरा मोठा विजय आहे. गेली चार वर्षे बंद असलेल्या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर सशर्त परवानगी दिली आहे. या निकालामुळे या जत्रा हंगामापासूनच ग्रामीण भागात पुन्हा धुरळा उडणार आहे. झाली रे आणि हुर्र.. अशी आरोळी घाटात घुमणार आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्रालाही पुन्हा चालना मिळणार आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पाठपुराव्यामुळेच ही शर्यत पुन्हा सुरु झाली याची श्रेयबाजी रंगणार आहे. विशेषकरून ग्रामीण भागात सर्वच राजकीय पक्षांत त्यावरून चढाओढ लागणार आहे. त्याचे संकेत आजच मिळाले आहेत. ही शर्यत पुन्हा सुरु व्हावी, यासाठी पाठपुरावा करणारे व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी दिल्ली येथे गेले काही दिवस ठाण मांडून बसलेले भोसरीचे बैलगाडा शर्यतप्रेमी पैलवान आमदार महेश लांडगे यांनी दंड ठोपटून विजयी झाल्याची प्रतिक्रिया या निकालावर दिली आहे.

न्यायालयाने बैलगाडाप्रेमी आणि शेतकऱ्यांची रास्त बाजू समजून घेऊन सकारात्मक निकाल दिला. बळीराजाचा हा सर्वार्थाने मोठा विजय आहे, असे भाजपा शहराध्यक्ष असलेले आमदार महेश लांडगे म्हणाले. पक्षभेद विसरून राजकीय जोडे बाजूला ठेऊन बैलगाडा शर्यतीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले आहेत. तर, आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना य़श येऊन ही बंदी उठल्याचे ती उठण्यासाठी प्रयत्नशील असलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. ही शर्यत पुन्हा सुरु होणे हा तमाम शर्यतप्रेमींसाठी चांगला निर्णय असून सांस्कृतिक स्वातंत्र्यांचा मोठा विजय आहे, असे ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे. बैलगाडा मालकांच्या सातत्य व अथक प्रयत्नातून हे साध्य शक्य झाले आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

या निर्णय़ाचे स्वागत करताना आता या शर्यती आता पुन्हा सुरु होतील. पण, त्या राज्य सरकारने अधोरेखित केलेल्या नियम व शर्तींचे पालन करून आयोजित कराव्यात, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे. बैलगाडा शर्यतीला पुन्हा सशर्त परवानगी मिळाल्याचे समजताच लगेचच दुपारी एक वाजता पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या कार्यालयाबाहेर आनंदोत्सव करण्यात आला. तर, लांडगेंच्या भोसरी येथील निवासस्थानाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली गेली.

विशेषकरून आपल्या लेकराप्रमाणे बैलगाडा शर्यतीच्या बैलांना जपणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा अतिव आनंद झाला आहे. या शर्यतीत बैलांना इजा होत असल्याने तसेच, तो केंद्र सरकारच्या संरक्षित प्राण्यांच्या सूचित असल्याचे दाखवीत पेटा या प्राणीप्रेमी संघटनेने न्यायालयात धाव घेतल्याने 2011 ला ही बंदी आली होती. त्यावर राज्य सरकारने 2017 ला कायदा केला. त्याविरोधातही प्राणीप्रेमी न्यायालयात गेल्याने पुन्हा बंदी आली, त्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, तेथे तीन वर्षे ही याचिका सुनावणीसच आली नव्हती. अखेर या महिन्यात ती न्यायालयाच्या बोर्डावर आली. दोन सुनावणीनंतर आज निकाल आला. कर्नाटक आणि तमिळनाडूत ही शर्यत सुरु असल्याने महाराष्ट्रातही ती सुरू करण्यास परवानगी दिली गेली. कारण ही बाब महाराष्ट्राच्या वतीने बाजू मांडणारे राज्याचे महाधिवक्ता ॲड. मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT