Raj Thackeray Letter News Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray Letter News : उपोषण सोडा तब्येत जपा, राज ठाकरेंचे जरांगे पाटील यांना पत्र...

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा पेटले आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि राजकीय पक्ष, शासकीय कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. (MNS News) तिकडे अंतरवालीत मनोज जरांगे यांनी आपले दुसऱ्या टप्प्यातील बेमुदत उपोषण सुरू करून सात दिवस झाले आहेत. राज्य सरकारला मात्र अजूनही या मराठा आरक्षणावर उपाय सापडलेला नाही. जरांगे यांनी स्वतः मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही कायद्याच्या पदावर असलेल्या मंत्री, आमदार, खासदाराला गावबंदी केली आहे.

बेमुदत उपोषणाच्या दरम्यान जरांगे यांच्या भेटीला फक्त छत्रपती संभाजीराजे, शाहू महाराज छत्रपती हे अंतरवालीत आले होते. अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी धाव घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही जरांगे यांची भेट घेऊन तिथे वस्तुनिष्ठ भाषण केले होते. तसेच जरांगे यांची मागणी वेगळी असल्यामुळे त्या संदर्भात काय करता येईल याची चर्चा आपण मुख्यमंत्र्यांशी करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी जरांगे यांना दिले होते.

दरम्यान, राज्यात अनेक घडामोडी घडल्या आणि आता मराठ आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन या वळणावर येऊन ठेपले आहे. मनोज जरांगे सात दिवसांपासून उपोषण करत आहेत, अन्न-पाणी, वैद्यकीय उपचार ते घेत नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर (MNS) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवतानाच जरांगे यांना उपोषण सोडा, तब्येत जपा, अजून आपल्या पुढे खूप काम करायचं आहे, असे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचे हे पत्र जसेच्या तसे..

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,

सस्नेह जय महाराष्ट्र !

इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तत्काळ थांबवावं, अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.

तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.

ह्यासाठी आता गावागावांतील तरुण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही.

ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश - बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वांनी आताच काळजी घेणं महत्त्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्यकर्तव्य आहे.

म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही. आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेव्हाच मी आपल्याला बोललो होतो, की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक राहायला पाहिजे.

आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हेही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहीत नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका. भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच”म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे.

जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासनं कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मतं मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या, आम्ही सत्तेवर येताच तत्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवलं की, कोण तुम्ही? कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उद्धटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरं संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत. मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो, की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते.

सगळ्यांना हेही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा. तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा, ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच.

परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जिवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू.. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत राहतात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक”असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू..

पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”..

शुभेच्छा आणि पुन्हा एकदा, जय महाराष्ट्र !

आपला

राज ठाकरे

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT