Raj Thackeray | Manmohan Singh Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : 'न बोलता, जे करून दाखवलं ते अनेकांना..!' राज ठाकरेंची सूचक पोस्ट

Raj Thackeray Tribute to Manmohan Singh : अभ्यासू, संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती गमावल्याची भावना सगळ्यांकडूनच व्यक्त होत आहे. राज ठाकरे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना सोशल मीडियावर पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे.

Rashmi Mane

Dr Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल (26 डिसेंबर) त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासोबतच सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर पंतप्रधान पद मिळवले.

त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातील दिग्ग्जांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुशल अर्थतज्ज्ञ,अत्यंत नम्र, अभ्यासू, संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती गमावल्याची भावना सगळ्यांकडूनच व्यक्त होत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डॉ.मनमोहन सिंग यांना सोशल मीडियावर पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे.

इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही. राज ठाकरेंनी अशी सूचक पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती.

अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.

जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग.

पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, "I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament.... "

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन...

राज ठाकरे ।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT