Raj Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra local body elections: उद्धव, राज ठाकरेंना घरचा आहेर; विश्वासू नेताच म्हणाला, 'महाराष्ट्र पालथा घातला असता तर आकडे....' .

Raj Thackeray politic News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना घरचा आहेर देताना या विश्वासू नेत्यांने 'महाराष्ट्र पालथा घातला असता तर आकडे बदलले असते' असे म्हणत डोळ्यात अंजन घातले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे गमक कशात आहे, याची बारीकसारीक नोंद घेत परखड विचार मांडले आहेत.

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना घरचा आहेर देताना या विश्वासू नेत्यांने 'महाराष्ट्र पालथा घातला असता तर आकडे बदलले असते' असे म्हणत डोळ्यात अंजन घातले आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असा खणखणीत फटकाराही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार संजय राऊत यांनी विरोधकांना सामन्यातील अग्रलेखातून परखडपणे लगावला.

यापूर्वीच्या काळात संजय राऊत यांनी नेहमीच सताधाऱ्यांना फटकारे लगावण्याचे काम केले आहे. मात्र, रविवारच्या 'सामना'च्या लेखातून त्यांनी यावेळी स्वपक्षीय आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. नैराश्यच्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी सामानातील संपादकीयाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. त्यांनी राजकीय विचारधारा बाजूला ठेवून परखडपणे विचार मांडले आहेत.

तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच टिकेल

महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या शिवसेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. शिवसेनेची (Shivsena) पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकऱ्यांपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असे मत राऊतांनी यावेळी मांडले.

उद्धव आणि राज ठाकरेंना सुनावले

लोकभावनेचा दाखल देत यावेळी संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. मोदी, शहा, फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले हे खरे. तरीही त्यांचेही लोक मोठया प्रमाणात पराभूत झाले. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाजपच्या विजयाचे गमकच संगितले

राज्यात पार पडलेल्या स्थानिकच्या निवडणुकीचे त्यांनी विश्लेषण केले आहे. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण राज्यभरातील निवडणुकीचे विश्लेषण केले आहे. मुंबई व इतर काही महापालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने ‘बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे त्या ठिकाणी त्यांनी इतर पक्षांतील कार्यकर्ते सरळ विकत घेतले. निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही. भाजपने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व ‘तालेवार’ लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले. त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत, असे विश्लेषण त्यांनी केले.

सीएम फडणवीसांच्या कार्यशैलीचे केले कौतुक

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यशैलीचेही विश्लेषण केले. फडणवीस प्रत्येक निवडणुकीत स्वतः उतरले. भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरले. पक्षाचा कार्यक्रम राबवला. निवडणूक लढवणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी’ ठरवतात. त्यासाठी त्यांनी पैशांचे बळ वापरले, असा मुद्दा राऊतांनी मांडला. तर या निवडणुकीत शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत 162 जागा मिळाल्या. रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतले, याकडे राऊतांनी लक्ष वेधले.

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला

शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला. पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने 165 जागा जिंकल्या हे विसरून चालणार नाही, याकडे राऊतांनी मोठे भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादीची जमेची बाजू मांडतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पीछेहाटही समोर आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT