Nana Patole,MVA, Vijay Wadettiwar
Nana Patole,MVA, Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News :''आघाडी सरकार टिकलं असतं,मात्र,नाना पटोलेंनी...!''; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : काँग्रेसचे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान,काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांनी जर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं असं खळबळजनक विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची गुरुवारी(दि.९) दिल्लीत भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी थोरात पटोले वादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

वडेट्टीवार म्हणाले,नाना पटोलेंसारखा सक्षम नेता विधानसभेच्या अध्यक्षपदावर विराजमान होता. त्यांनी सभागृह उत्तमपणे चालवलं, सभागृहाचं नियंत्रण त्यांच्या हातात होतं. नाना पटोले यांच्याकडे राज्यातले नागरिक अभ्यासू नेता म्हणून पाहात होते. परंतू, त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि राज्यात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

त्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार(MVA)ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यावेळी नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको हाता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकलं असतं अशा अनेकांच्या भावना होत्या असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील थोरात -पटोले वादावर भाष्य करताना हा संघर्ष माध्यमांसमोर यायला नको होता असंही विधान केलं आहे.

खर्गे यांच्याशी झालेल्या भेटीवर विजय वडेट्टीवार म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची मी दिल्लीत भेट घेतोय. राजकीय चर्चा आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चाही केली. त्यावेळी राज्यातील राजकारणाची त्यांना माहिती दिली असंही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

'' पटोलेंमुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं..''

नाना पटोले (Nana Patole) यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तिथूनच संकटांची मालिका सुरु झाली. अध्यक्षपदी पटोले असते तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेले अनेक पेच टाळता आले असते. पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणं सोपं झालं असतं. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही, त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार आणि त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीला झाला असा आरोप ठाकरे गटानं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT