Ahilyanagar AYUSH Hospital : लोकसभा निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी भाजपचे तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्राकडे पाठपुरावा करत, अहिल्यानगर शहरातील आयुष रूग्णालयाचं काम पूर्णत्वास नेलं. आता अहिल्यानगर शहरातील आयुष रुग्णालय दमदारपद्धतीने लोकांना आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार देत आहेत.
याच रूग्णालयाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष रुग्णालय’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. खासदार लंके यांनी केंद्र सरकारने याला अनुकूलता दर्शवली असल्याचा दावा केला आहे.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आयुष रूग्णालयाला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवून, भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्यावर कुरघोडी केल्याचं दिसतं आहे. खासदार लंके यांच्या या भूमिकेवर विखे पाटील यांच्याकडून अजून प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
अहिल्यानगर (Ahilyanagar) दक्षिण लोकसभा मतदारसंघातील केंद्र प्रायोजित आयुष रुग्णालयास ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष रुग्णालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार लंके यांच्या प्रस्तावास मंत्री प्रतापराव जाधव यांनी अनुकूलता दर्शवित कार्यवाहीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग केला आहे.
खासदार लंके यांनी 15 डिसेंबर 2025 आयुष मंत्रालयाला सविस्तर पत्र पाठवून या नामकरणामागील सामाजिक व संविधानिक भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रामीण भागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वंचित घटकांसाठी संबंधित आयुष रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समानता व सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अभिवादन म्हणून या रुग्णालयास त्यांचे नाव देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासदार लंके यांच्या पत्रास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी 30 मार्च 2026 पाठविलेल्या उत्तरात या प्रस्तावाची दखल घेतली असून, संबंधित विषय महाराष्ट्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
मंत्री जाधव यांनी स्पष्ट केले की, संबंधित रुग्णालय राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत ‘50 खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय’ म्हणून मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नावात राष्ट्रीय आयुष अभियानाचा संदर्भ असणे आवश्यक आहे. तसेच केंद्र प्रायोजित योजना असली तरी नामकरणाचा अंतिम अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सदर प्रस्ताव दिनांक 16 मार्च 2026 महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, आता या नामकरणाबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. या नामकरणामुळे सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळकटी मिळेल. वंचित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रस्तावास स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच राज्य सरकार यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.