Ajit Pawar, Rohit Pawar Sararnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवारांना अजितदादा पावले ! कुकडीच्या आवर्तनाबाबत घेतला मोठा निर्णय

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : नगर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप वाया गेला, तर आता रब्बीवरही दुष्काळाचे सावट आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आवर्तनाची मागणी केली आहे. त्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतल्याने रोहित पवारांना अजित पवार पावल्याची चर्चा नगरमध्ये आहे.

यंदा पावसाअभावी खरिपातील पिके वाया गेली. आता शेतकऱ्यांची संपूर्ण आशा रब्बी हंगामातील पिकांवर आहे. नगरमधील रब्बी पिकांची मदार धरण प्रकल्पांतील पाण्यावर असते. कर्जत-जामखेडमधील शेतकऱ्यांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री पवारांना पाण्याच्या अवर्तनाचे साकडे घातले होते. यावर दहा दिवस आधीच पाणी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) तालुक्यासाठी महत्त्वाच्या कुकडी धरणाचे आवर्तन 5 डिसेंबर रोजी सोडले जाणार आहे. आमदार रोहित पवारांनी 15 डिसेंबरला सुटणारे आवर्तन दहा दिवस आधी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला आणि नागरिकांना फायदा होणार आहे. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत पाऊस झाला नसल्याने रब्बीवर दुष्काळाचे सावट होते. परंतु, दहा दिवस पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऑक्टोबर महिन्यात 20 तारखेला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला कर्जत-जामखेडचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री (Ajit Pawar) अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून लवकर आवर्तन सोडण्याची मागणी रोहित पवारांनी केली होती. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला नसल्याने कुकडीचे आवर्तन 15 ते 20 दिवस अगोदरच सोडण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे अजित पवारांनी पुढाकार घेत पाणी लवकर सोडण्याचे नियोजन केले.

दरम्यान, रोहित पवारांनी ऑक्टोबरपासूनच अजित पवारांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे या आवर्तनाबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. आता सुटणाऱ्या आवर्तनामुळे कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील ५४ गावांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

कर्जत-जामखेड तालुके दुष्काळप्रवण आहेत. त्यामुळे कुकडीच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार तसेच भाजप आमदार राम शिंदेंचे सातत्याने प्रयत्न असतात. पाणी सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नात दोघांमध्ये अनेकदा श्रेयवाद उफाळून आलेला आहे. आता आमदार पवारांनी उपमुख्यमंत्री पवारांचा हवाला देत केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे म्हटले आहे. यावर आमदार शिंदे काय भूमिका मांडतात, हेही पाहावे लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT