Balasaheb Thorat Vs Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Vs Devendra Fadnavis : फडणवीस चक्रव्युहात कसे अडकले; थोरात म्हणाले, 'नको ते उद्योग केले'

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा महायुतीत गोंधळ वाढला आहे. जागा वाटप असू किंवा इतर मुद्यांवर महायुतीत विसंगती दिसते. महायुतीमधील मित्र पक्षांना संभाळताना भाजपची त्रेधा उडत आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गोंधळून गेलेत. एकप्रकारे ते चक्रव्युहात अडकल्याची टीका होऊ लागली आहे.

यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील निशाणा साधला. 'राज्यात नको ते उद्योग करण्याची भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर टाकल्याने ही परिस्थिती त्यांच्याभोवती उद्भवली आहे', असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सकारात्मक बैठका होत आहे. परंतु महायुतीतील सुरू असलेल्या धुसफूसवर त्यांनी निशाणा साधला. राज्यातील भाजपची परिस्थिती दयनीय झाली आहे. दोन मित्रपक्षांनी कोंडी केली आहे. शिवसेना (Shiv Sena) आमदारांच्या बेताल विधानांमुळे आणि वागणुकीमुळे राज्यात महायुतीवर आघात होत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात अप्रत्यक्षरित्या 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे.

महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (Congress) भूमिका बघितल्यात भाजप एकटा पडल्याचे दिसते. या चक्रव्युहात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडकले आहेत, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. थोरात पुढे म्हणाले, "फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आज ती परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे, ती त्यांच्याच पक्षाने आणली आहे. राज्यात नको ते उद्योग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर भाजप नेतृत्वाने टाकली आहे". यात फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

"राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण कोणाला आवडलेले नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. लोकांच्या देखील ते लक्षात आहे. महायुती भाजप सरकारचा कारभार गेल्या अडीच वर्षात जनतेला पाहिला आहे. महाराष्ट्राचे सर्वच पातळीवर झालेले अधिपतन सर्वसामान्यांनी लक्षात ठेवले आहे. त्याचे परिणाम, महायुतीला भोगावे लागतील", असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

अजितदादांवर थोरातांचा निशाणा

बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. 'महायुतीत नव्हे, तर महाविकास आघाडीत देखील अर्थ खात्याने मनमानी कारभार केला', असा टोला थोरातांनी अजित पवारांना लगावला. गेल्या पाच वर्षातील आणि त्यातल्या त्यात अलीकडच्या अडीच वर्षातील महाराष्ट्रातील राजकारणाची नोंद, दुर्दैवी अशी होईल, असेही थोरात यांनी म्हटले. शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यात अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते असल्याचे विधान केले होते. गुलाबराव पाटील यांच्या पाठोपाठ थोरात यांनी अर्थ खात्यावर निशाणा साधून अजितदादांच्या कारभाराव शंका उपस्थित केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT