Farmers blocks Road in Nashik  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: भाजपच्या कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष!

Sampat Devgire

Farmers Politics : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर लगेचच केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. वर्षभरात दुसऱ्यांदा निर्यात बंदी करण्यात आली. त्यामुळे कांद्याचे दर गडगडले. कांदा उत्पादकांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. (Centre government`s big shocked to the farmers through onion prices down)

केंद्रातील भाजप (BJP) सरकारने कांदा निर्यात बंदी केली. त्यामुळे भाव गडगडले. जिल्ह्यात (Nashik) त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. लिलाव बंद, निदर्शने, रास्ता रोका करीत शेतकऱ्यांनी (Farmers) निषेध केला. शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्याचा निषेध करीत भाजपला धडा शिकविण्याचा इशारा दिला.

कांदा निर्यातबंदीबाबत ‘डीजीएफटी’ने परिपत्रक काढले आहे. देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. हा निर्णय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार होता. यानंतर स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबरला निर्यातमूल्य ८०० डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३१ डिसेंबरपर्यंत एमईपी ८०० डॉलर प्रतिटन ठेवण्यात आले होते. मात्र, ८ डिसेंबरलाच पुन्हा केंद्राने नोटिफिकेशन काढून कांदा निर्यातबंदी लादली आहे.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय काल दुपारी झाला. त्याने लगेचच भाव कोसळले. त्यावर शेतकरी संतप्त झाले. लासलगाव, चांदवडला लिलाब बंद करण्यात आले. चांदवड, येवला, लासलगाव येथे रास्ता रोको झाल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. त्याने आगीत तेलाचे काम केले. त्यामुळे सबंध जिल्ह्यात व प्रत्येत तालुक्यात त्यावर आंदोलन झाले. याबाबत अतिशय तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.

निर्यातबंदीनंतर नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, मनमाड, उमराणे, लासलगाव येथे सुरू असलेले कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडत निषेध केला. झोडगे, सिन्नर, चांदवड येथे शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ केला. चांदवड येथे आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आल्याने संतापात भरच पडली. केंद्राच्या निर्णयाबद्दल कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका बसणार असून, केंद्राने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा निर्यात बंदीचे हत्यार उपसले आहे.

शेतकरी रस्त्यावर उतरले असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र सावरकर प्रकरणावर काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. भाजपचे आमदार, खासदार असलेल्या ठिकाणी झालेल्या आंदोलनात चांदवड, येवला, लासलगाव येथे पोलिसांनी शेतकऱ्यांविरोधात लाठीमार केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना यांना केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत नवा मुद्दा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT