CM Eknath Shinde & Dr Bharti Pawar Sarkarnam
उत्तर महाराष्ट्र

Dr. Bharti Pawar News : केंद्रीय मंत्र्यांनीच दुष्काळाची मागणी केली, एकनाथ शिंदे मदत करतील का?

Sampat Devgire

Farmers Drought news : पावसाने पाठ फिरवली आहे. त्याचे तीव्र पडसाद उत्तर महाराष्ट्रात उमटले आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे याबाबत काय व केव्हा निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे. (Centre minister given letter for drought relief to farmers)

नाशिक (Nashik) विभागात तीव्र टंचाईची स्थिती आहे. शेतकरी (Farmers) अडचणीत आहे. (Dr. Bharti Pawar) यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याबाबत केव्हा निर्णय घेणार, याची विचारणा होत आहे.

राज्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाने महिनाभरापासून दडी मारली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण झाले.

यासाठी राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे.

डॉ. पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव मांडले. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने नाशिकसह राज्यातील अन्य जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकरीही चिंताग्रस्त झाला. धरणातही साठा नाही.

विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिम पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी, धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी या वेळी सांगितले.

पाण्याचा प्रश्न गंभीर

नाशिक जिल्ह्यात गेल्या ३० दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने अपुऱ्या पावसामुळे धरणांतील साठाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये आजमितीस जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न गंभीर झाल्याचे या वेळी डॉ. भारती पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT