Nagar Gram Panchayat Election Result Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram panchayat Result : नगर जिल्ह्यात भाजपच नंबर वन... 90 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा जिल्हाध्यक्षांकडून दावा

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींपैकी ९० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, असा दावा पक्षाचे नगर उत्तर आणि नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. भाजपच जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असून, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना मिळालेला यश पाहता नगरमध्ये महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे. (gram panchayat Election Result : BJP's victory in more than 90 gram panchayats in Nagar district)

निकालानंतर विविध पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे करत तालुक्यात आपणच किंवा आपलीच आघाडी, महायुती एक नंबर असल्याचे म्हटले जात आहे. एकंदरीत चित्र पाहता जिल्ह्यात भाजप क्रमांक एक, राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या आणि शरद पवार राष्ट्रवादी गट चौथ्या, शिवसेना शिंदे गट पाचव्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. लढवलेल्या निवडणुका या पक्ष चिन्हावर नव्हे; तर पॅनेल पद्धतीने आणि स्थानिक गणिते जुळवून लढवल्या गेल्याने पक्षांनी दावा केलेल्या संख्येचा मेळ साधणे अवघड आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना उत्तरेतील बहुतांशी ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याचे सांगितले. उत्तरेत जवळपास ४६-४७ ग्रामपंचायती या भाजपने जिंकल्या असून, २ अपक्ष सरपंचांनी भाजपला पाठिंबा दिल्याने हा आकडा ४८ ते ४९ पर्यंत जात असल्याचा दावा केला. महायुती सरकारची सर्वसमावेशक कामगिरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावपातळीवर दिलेल्या विविध योजना यामुळे ग्रामीण जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याचे लंघे म्हणाले.

नगर दक्षिणचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला केंद्रीभूत ठेवून दिलेल्या योजना या टॉप टू बॉटम गेल्या. यात भाजप कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर यशस्वी काम केल्याने दक्षिण नगर जिल्ह्यात ४७ ते ५० ग्रामपंचायती भाजपच्या हातात आल्याचा दावा केला.

जिल्हाध्यक्ष लंघे आणि भालसिंग या दोघांनीही आगामी जिल्हा परिषदा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर संपूर्ण नगर जिल्हा भाजपमय झाल्याचे दिसून येईल, असा दावा केला आहे. महायुतीमधील तीनही पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुकांत सत्तेत असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत श्रीरामपूर तालुक्यातून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) नगर जिल्ह्याच्या सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला. पारनेर, शेवगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक-एक ग्रामपंचायतीवर यश मिळवल्याचे दिसून येत असून, काही ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. ते आता कोणत्या पक्षात वा गटात जातात, हेही पाहवे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT