Malegaon Bomb Blast : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहराला हादरवून सोडणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाच्या घटनेला आज जवळपास 17 वर्षं होत आहेत. मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटानंतर अनेक कुटुंबांचं आयुष्य उध्वस्त झालं.
तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी एनआयएने केली होती. परंतु न्यायालयाने आरोपींविरोधात पुरावे नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवता येणार नाहीत. एनआयएकडून सादर करण्यात आलेले पुरावे आरोपींना दोषी सिद्ध करण्यास अपुरे आहेत. असे निरीक्षण नोंदवत सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका केली.
नेमकं काय घडलं होतं?
२९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात मशिदी जवळ मालेगावमधील भिकू चौकात ठेवण्यात आलेल्या एका दुचाकीचा स्फोट झाला होता. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. फरहीन उर्फ शगुफ्ता शेख लियाकत, शेख मुश्ताक शेख युसूफ, शेख रफिक शेख मुस्तफा, इरफान जियाउल्ला खान, सय्यद अजहर सय्यद निसार, हारुन शहा मोहम्मद शहा हे सहा जण यामध्ये मृत्यूमुखी पडले. १०० हुन अधिक जण यात जखमी झाले होते.
स्फोट झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, ३० सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी ३०७, ३५२, ३२६, ३२४, ४२७, १५३-अ, १२०ब, स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या घटेनचा तपास केला, त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (ATS) तपास हाती घेतला.
एलएमएल फ्रीडम (MH15P4572) क्रमांकाच्या बाईकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. या दुचाकीमुळे स्फोट झाल्याचे उघडकीस आले. परंतु गाडीवर सापडलेला नंबर चुकीचा होता आणि त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबरदेखील खोडून टाकण्यात आला होता. याप्रकरणी चौकशी केली असता एफएसएल टीमला गाडीचा अचून नंबर सापडला. ज्याद्वारे ती दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचं उघड झालं. घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. संपूर्ण प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली होती. तर साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं.
साक्षीदारांनी बदलले जबाब
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास केला त्यानंतर एटीएस आणि नंतर एनआयएने तपास केला आहे. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले असून, त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले. साक्षीदारांनी न्यायालयात अनेक वेळा सांगितले आहे की बंदुकीच्या धाकावर धमकी देऊन त्यांचे जबाब घेण्यात आले. वारंवार आणि जबाब बदलणाऱ्या साक्षीदारांवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तथापि, आज १७ वर्षानंतर न्यायालयाने याप्रकरणावर निकाल दिला.
मालेगाव स्फोट प्रकरणाचा घटनाक्रम
29 सप्टेंबर 2008 – मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी.
ऑक्टोबर 2008 – ATS ने तपासाला सुरुवात केली; साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर संशयितांना अटक.
2009 – प्रकरणाचा तपास एनआय कडे (NIA) सोपवण्यात आला.
2011 – NIA ने प्रथम आरोपपत्र सादर केले.
2016 – NIA कडून सुधारित आरोपपत्र दाखल; पुराव्यांचा अभाव असल्याने मोक्का कायदा रद्द.
2017 – सर्वोच्च न्यायालयाकडून कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर.
2017 – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनाही न्यायालयाकडून जामीन मिळाला.
2018 – विशेष NIA न्यायालयाने या प्रकरणातील आरोप निश्चित केले.
2019 – साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला. त्या खासदार झाल्या
2023–2024 – खटल्यादरम्यान अनेक साक्षीदारांनी आपल्या जबाबांत बदल केला; तपासादरम्यान दबाव असल्याचे आरोप.
31 जुलै 2025 – विशेष NIA न्यायालयाने सर्व आरोपींना दोषमुक्त करत निर्दोष घोषित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.