Maulana Mufti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Politics : मालेगावातही घडू पाहतेय एक नवे ‘पवना’ प्रकरण?

Sampat Devgire

Malegaon AIMIM Politcs : येथील ‘एमआयए’चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी बंद जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यामुळे एक नवा वाद उभे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केल्याने पुण्यासारखेच मालेगावातही पवन प्रकरणासारखा वाद घडण्याची चर्चा सुरू झाली आहे. (Malegaon water issue take a new turn of Farmers versus MLA)

मालेगाव (Malegaon) शहरातील पिण्याच्या पाण्याच्या (Water) प्रश्नावर राजकारण सुरू झाले आहे. आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (MIM) यांनी बंद जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची मागणी केली. त्यासा शेतकऱ्यांनी (Farmers) विरोध केला.

शहरासह कसमादे परिसरात पावसाने दिलेली ओढ, धरणातील अत्यल्प पाणीसाठा, दुष्काळी परिस्थिती या पाश्‍र्वभूमीवर उपाययोजना व खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने शहरात १ सप्टेंबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

या पार्श्वभूमीवर शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, पाण्याची चोरी टाळण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी चणकापूर ते तळवाडे थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करावा. जलवाहिनीसाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी केली.

आमदार मुफ्ती यांच्या मागणीला गिरणा डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे भविष्यात मालेगावच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न अधिक तीव्र होणार आहे.

पाणी प्रश्‍नावरुन शहरी विरुद्ध ग्रामीण हा संघर्ष सातत्याने सुरु आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असले तरी सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने येथील शेती संकटात आहे. १९१५ मध्ये ब्रिटिशांनी चणकापूर धरण हे शेती सिंचनासाठी बांधले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण झाल्यानंतर सिंचनाला पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने जलवाहिनीद्वारे पाणी देण्यास विरोध असल्याचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांनी सांगितले. आपल्यासह चणकापूर ते टेहरेपर्यंत नदीकाठच्या दोन्ही जनतेचा आमदारांच्या मागणीला तीव्र विरोध आहे. चणकापूर धरणातून गिरणा डावा उजव्या कॅनॉलद्वारे शेतीला पाणी देण्याचे प्रयोजन होते. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी तळवाडे येथे पाझर तलाव बांधून ते पाणी दिले जाते.

वास्तवात या पाण्यावर शेतकऱ्यांचा प्रथम हक्क आहे. त्याऐवजी नार-पार मांजरपाडा-२ व वांजूळ पाणी योजनेला मंजुरी आणावी. या योजनेमुळे गिरणा नदी आठ महिने वाहण्यासाठी व शेती सिंचनासाठी मोठा लाभ होतानाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटेल. विनाकारण चुकीच्या सूचना करून वाद निर्माण करु नये. शहराला पाणीपुरवठ्यासाठी नदी व पाट कालव्याने पाणी येते तेव्हा काठावरच्या विहिरींना पाणी मिळते. शेतीसाठी ते काही प्रमाणात लाभदायी असते. मुळात शासनाकडे मागणी करून गिरणा धरणामध्ये शहरासाठी ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असते.

या योजनेचे वीज बिल भरपूर येते म्हणून महापालिका सुमारे ४५० दशलक्ष घनफूट पाणी उचलते. उर्वरित शिल्लक पाणी जळगावकर वापरतात. कमी पाण्याची साठवण क्षमता असलेल्या चणकापूरमध्ये लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्यापेक्षा नार-पार, मांजरपाडा-२ व वांजूळ पाणी योजनेसाठी सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा श्री. अहिरे यांनी व्यक्त केली असून पाट कालवे, तलाव व धरण परिसरातून पाणी चोरी होत असल्याचे आरोप निरर्थक असल्याची टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT