BJP Vs NCP Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Political News : अमृता पवारांना आमदार होण्याची लईच घाई; महायुतीतल्या भाजप-राष्ट्रवादीतच जुंपली!

Sampat Devgire

Nashik News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात पाणी प्रश्नावरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून भाजपच्या नेत्या अमृता पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यात महायुती सत्तेत एकत्र, मात्र स्थानिक पातळीवर महायुतीतल्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. (Latest Marathi News)

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे येवला मतदार संघाचे सोशल मीडिया प्रमुख गणेश गवळी यांनी पालखेड कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावर भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर गंभीर टीका केली. भाजपच्या अमृता पवार यांना आमदार होण्याची घाई झाली आहे, असे म्हटले आहे. यामुळे आता अजित पवार गट आणि भाजपच्या नेत्यांमध्येच जुंपली असल्याचे चित्र आहे.

पालखेड धरणाचे आवर्तन येवला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. मात्र चारी क्रमांक 46 ते 52 दरम्यान पाणी सोडण्यात आलेले नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने राजकीय दबावातून शेतकऱ्यांचे पाणी रोखले अशी तक्रार आहे. याबाबत संबंधित गावांचे शेतकरी येवला येथे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे या विषयावर राजकारण चांगलेच पेटले असून भुजबळ समर्थक आणि भाजपच्या पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सोशल मीडिया प्रमुख गवळी यांनी भाजपच्या पवार यांच्याबाबत टीका केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात विविध विषयांवर राजकारण पेटले आहे. या गोंधळात येवला मतदारसंघात काही भावी आमदार तयार झाले आहेत. हे लोक प्रत्येक प्रश्नात राजकारण आणि आहेत कुठल्याच नियम निकषांची माहिती न घेता मनाला येईल तो कायदा समजून आमदारकीसाठी कायदा हातात घेण्याचे काम करीत असल्याचे, ते म्हणाले.

"कायद्याचे राज्य आहे, याचाच त्यांना विसर पडलेला दिसतो. पालखेड डाव्या कालव्या नाशिक विभागाचे रब्बीच्या सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने मुबलक पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे एकच आवर्तन सोडण्याचा जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. नाशिकच्या संयुक्त नियोजनातून किती पाणी सोडावे हे निश्चित केले आहे. त्याप्रमाणे पाण्याचे वितरण सुरू आहे. मात्र चारी क्रमांक 25, 26 आणि 28 चे गेट अनधिकृतपणे उघडण्यात आले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागा विरोधात आंदोलनासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याची तक्रार आहे," असे गवळी म्हणाले.

"पालकमंत्र्यांच्या आदेशाने चारी क्रमांक 46 ते 52 या गावांना पाणी सोडण्यात येणार होते. मात्र काही गेट अनधिकृतपणे उघडण्यात आल्याने नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे मानोरी आणि देशमाने गावाला पाणीपुरवठा झालेला नाही. व्यवस्थेत गोंधळ निर्माण करून भाजपच्या अमृता पवार यांनी राजकारण सुरू केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आमदार होण्याची स्वप्न पडत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहन देऊन आमदार होण्याची घाई झाल्याचे दाखवत आहे," असाही टोला गवळींनी लगावला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT