Jayant Patil & Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Politics : दिंडोरीत जाऊन जयंत पाटील नरहरी झिरवाळ यांना आव्हान देणार का?

Sampat Devgire

Jayant Patil v/s Narhari Zirwal : पालकमंत्री, सत्ताधारी आमदार, भाजप तसेच शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस नंतर उद्या (ता. १) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शेतकऱ्यांचा असला तरीही दिंडोरीच्या राजकारणात ठोस भूमिका व नेतृत्व निर्माण करणारा ठरू शकतो. (NCP leader Jayant Patil will take out farmers march against State Government)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिंडोरी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) हा बालेकिल्ला म्हणजे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील प्रस्थापित नेते शरद पवार गटाचे, की उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे हे ठरविणारा हा मोर्चा असेल.

दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्याभोवती फिरत असते. सध्या शेटे साखर कारखान्याच्या काही प्रकल्पांमुळे राज्यातील सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटासोबत आहेत. मात्र, नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांचीदेखील भेट घेतली होती.

मात्र, ते नक्की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत, की शरद पवार यांच्यासोबत हे स्पष्ट होत नाही. कारण ते राजकारणात सक्रिय नाहीत. नरहरी झिरवाळ हे शेटे यांच्याच गटाचे मानले जातात. त्यामुळे उद्या (ता. १) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मोर्चा या दोन्ही नेत्यांची परीक्षा घेणारा असेल. त्यातून ते कोणत्या गटात हे स्पष्ट होईल.

अवकाळी पावसाने नाशिकच्या राजकारणाला चांगलेच हादरे दिले आहेत. आधी दुष्काळ नंतर झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट केली आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांना घराबाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागले. सध्या जिल्ह्यातील एमआयएमचे मौलाना मुफ्ती आणि काँग्रेसचे हिरामण खोसकर हे दोघे वगळता उर्वरित सर्व तेरा आमदार सत्ताधारी पक्षात आहेत.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या दुष्काळात पिके वाया गेली, त्यात विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना काहीच दिले नाही, मग आता काही मिळेल ही आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे जेव्हा पाहणीला गेले तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना खडे बोल सुनावले.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना तर सकल मराठा समाजाकडून आमच्या बांधावर येऊच नका, अशी टोकाची भूमिका घेतली. विकासाची ढाल पुढे करीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांना संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांच्या काहीच उपयोगी पडता येत नाही, ही खंत खुद्द आमदारांचे पाठीराखेच व्यक्त करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर दिंडोरीच्या राजकारणात शेटे, आमदार झिरवाळ आणि अन्य माजी आमदार यांचा विचार करता दत्तात्रय पाटील डोखळे या शेटे समर्थकांनी उद्याच्या मोर्चात आपली शक्ती पणाला लावली आहे. अशा स्थितीत प्रस्थापित नेत्यांनी गुळमुळीत भूमिका कायम ठेवल्यास अथवा ठोस भूमिका न घेतल्यास महाविकास आघाडीच्या मोर्चातून शरद पवार गटाचे दत्तात्रय पाटील डोखळे हे नवे नेतृत्व उभे राहू शकते. त्यामुळे उद्याच्या मोर्चात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील झिरवाळ आणि शेटे यांच्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT