Ahmednagar Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : राजकीय नेत्यांनी दिवाळीची संधी साधली, नगर जिल्ह्यात निवडणुकांसाठी जोरदार 'साखर पेरणी!'

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : साखर कारखान्यांकडून सर्वात मोठा सण दिवाळीला सभासदांना पूर्वीपासूनच बाजारभावापेक्षा कमी दराने साखर दिली जाते.आता राजकीय नेत्यांनी याच्यातही संधी शोधली आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार राजकीय नेत्यांनी कमी दराची ही साखर आता मोफत करून टाकली आहे. त्याची व्याप्ती वाढवून त्यात शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे.

राहाता-शिर्डी तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत साखर वाटप घोषणेनंतर आता आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात मोफत साखर वाटप आणि मोफत फराळ वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

गणेश साखर कारखान्याच्या उत्पादक आणि अनुत्पादक सभासदांना प्रत्येकी १० किलो साखर मोफत वाटप करण्याची घोषणा आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे तरुण नेते विवेक कोल्हे यांनी केली. या मोफत साखर वाटप निर्णयाला गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या राजकारणाची झालर होती. अगोदर 'गणेश'च्या सत्तेत असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishana Vikhe) यांनी त्यावेळी घेतलेल्या काही निर्णयांना म्हणून थोरात-कोल्हेंनी दिवाळी सणाचा मुहूर्त साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी याला प्रत्युत्तर म्हणून लागलीच विखे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात संपूर्ण राहाता-शिर्डी मतदारसंघातील नागरिकांना शिधापत्रिकेनुसार प्रत्येकी पाच किलो साखर दिवाळीसाठी मोफत देण्याची घोषणा केली.

या घोषणेनुसार सध्या राहाता-शिर्डी मतदारसंघातील गावागावांत खासदार विखे त्यांच्या मातोश्री, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या हस्ते मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. या साखर पेरणीची प्रसिद्धी व्यवस्थित होईल, याचीही काळजी दोन्ही गटांकडून घेतली जाते आहे.

आता पारनेर तालुकाही या मोफत साखर वाटप धोरणाच्या कार्यक्रमात पुढे सरसावल्याचे दिसून येत असून, तालुक्यातील काही गावांत आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली दरडोई एक किलो साखर मोफत देण्यात येणार आहे. एका गावाने दोन टन दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. म्हसोबाझाप ग्रामपंचायतमधील नागरिकांना प्रत्येकी एक किलोप्रमाणे चार टन साखरेचे वाटप केले जाणार आहे.

टाकळी ढोकेश्वर गटातील आदिवासी बांधवांसाठी दोन टन फराळ वाटप केला जाणार आहे. हा गोड कार्यक्रम आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते ११ नोव्हेंबरला होईल. एकूणच जिल्ह्यातील काही ठिकाणी नेत्यांनी यंदाची दिवाळी नागरिकांसाठी गोड करण्याचा निर्णय घेतला असून, ही साखर पेरणी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला मतांचे भरघोस पीक देईल का, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT