Radhakrishna Vikhe - Rajendra Pipada Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंचा पराभव दिसतोय, शिर्डीत उमेदवार बदलण्याची गरज; 'या' नेत्यानं विखेंविरोधात थोपटलं दंड !

Pradeep Pendhare

Nagar News : विखे यांच्या नावाशिवाय नगर जिल्ह्याचे राजकारण पूर्ण होत नाही. ते कोठेही असले तरी त्यांची ओळख ही पक्ष संघटनेपेक्षा विखे ब्रँड नावानेच अधिक होत असते. याचे साईड इफेक्ट देखील विखे आणि विक्री कुटुंबीयांना अनुभवास येतात. विखे यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये नगर जिल्ह्यात बेरजेत यायलाच तयार नाही. 2019 पासून ही परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विखेंविरुद्ध विरोधक एकाटवले दिसतात.

यातच भाजप अंतर्गत देखील विखेंविरुद्ध नाराजी वाढली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचा पराभव निश्चित आहे. मंत्री विखे आणि त्यांच्या कुटुंबाच्या सत्ता लालसेला आता नगरची जनता नाकारायला लागली असून, शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत उमेदवार बदलण्याची गरज व्यक्त करून यावेळेस आपल्याला संधी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच प्रत्यक्ष पक्षश्रेष्ठींना भेटून शिर्डीसह नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती सांगणार असल्याचे भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी मतदारसंघात पूर्वी विखेंविरुद्ध निवडणूक लढविली होती. पहिल्या 12 ते 13 फेऱ्यांपर्यंत 13 ते 15000 मतांनी पुढे राहिलो. माझा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर पक्षशिस्तचे पालन करत मी निवडणूक लढली नव्हतो. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजप नेते विखे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सत्ता दहशतीच्या राजकारणावर जनतेत नाराजी वाढत आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत असल्याचे भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी आहे. ते यावेळी निवडून येऊ शकत नाहीत. तेथील जनतेने बदल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच विधानसभा आपण लढवावी, असाही काहीसा सूर गाठीभेटीतून समोर येत आहे. त्यानुसार भाजपच्या वरिष्ठांशी पक्षश्रेष्ठींशी पत्रववहार करत उमेदवारी मागितली असल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती दिसते तशी नाही, असे सांगून ॲट्रॉसिटीचे प्रकार वाढले आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत. शिर्डी-नगर रस्ता 25 वर्षापासून प्रलंबित आहे. गेल्या 55 वर्षांपासून निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे, गुन्हेगारी कोणाच्या आशीर्वादामुळे वाढली आहे हे सर्वांना माहीत आहे.

शिर्डीच्या साई संस्थांन मंदिरांचे प्रमुख गेट सुद्धा कोणाच्या दहशतीमुळे बंद आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. देशातील सर्व मंदिरांमध्ये भक्तांना श्रद्धेपोटी फुल-प्रसाद घेण्याची परवानगी आहे. परंतु शिर्डी येथील देवस्थानमध्ये फुल-प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी कोणी घातली? फुल नेण्यास बंदी असताना सुद्धा यांच्यात बचत गटाकडून साई समाधीवरील फुलांपासून अगरबत्ती बनवून ती मंदिर परिसरात विक्री केली जाते, यावर राजेंद्र पिपाडा यांनी निशाणा साधला.

उत्पन्न बुडत असल्याने शिर्डी (Shirdi) परिसरातील फुल उत्पादक प्रचंड नाराज आहे. साई संस्थांच्या हॉस्पिटल कसे बंद पडेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिर्डी परिसरात साधे सरकारी मेडिकल आणि अभियांत्रिकी कॉलेज नाही. विरोधकांची अडवणूक करणे एवढाच धंदा सध्या सुरू आहे. कोणी आवाज उठवल्यास त्याच्याविरुद्ध खोटे गुन्हे आणि अपप्रचार करणारी यंत्रणा कार्यान्वित होते. ही यंत्रणा कोणाची आहे हे देखील जनतेला माहिती आहे. या सर्व प्रकारांना शिर्डीतील जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे शिर्डीत बदलाचे वारे वाहू लागल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी म्हटले.

तत्कालीन नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी 2005-06 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास मंजुरी घेतली होती. परंतु हा पुतळा कोणाच्या दहशतीमुळे आजही राहाता तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये पडून आहे, हे जनतेला चांगलंच माहीत आहे. शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांना संस्थांच्या सेवेत पूर्णवेळ सामावून घेण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.हा प्रश्न प्रलंबित राहण्यासाठी मागे कोण आहे हे देखील शिर्डीकरांना माहीत आहे. याबाबत विधानसभेत लक्षवेधी देखील मांडली गेली आहे.

एकच घरात 50-60 वर्षे सत्ता

शिर्डी परिसरात गोदावरी कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना अजूनही मिळत नाही, असे सांगून दहशतीचे राजकारणाला प्राधान्य दिले जात आहे. शिर्डीची जागा जिंकायची असेल, तर तिथे उमेदवार बदलणे गरजेचे आहे. भाजपला बेरीज हवी असेल, तर जनतेचा कौल पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेतला पाहिजे. पक्षश्रेष्ठींचे जनतेच्या कौलाचे लक्ष वेधण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले. एकाच कुटुंबात गेली 50-60 वर्ष सत्ता आहे.

तेच-ते चेहरे आता दिसत असून लोक त्यांना वैतागले आहेत. आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, कारखान्याचे चेअरमन, संचालक, जिल्हा बँकेमधील त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी, यामुळे जनतेला आता बदल हवा आहे. हे भाजपने आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निदर्शनास आणून देणार आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुढील 7 दिवसात भेट घेऊन शिर्डी विधानसभेचे, गणित मांडणार असल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.

मोक्का लागलेल्या आरोपींच्या कार्यालयाचे विखेंकडून उद्घाटन

नगर जिल्ह्यात सर्वाधिक कुठे गुन्हेगारी असेल, तर ती शिर्डीमध्ये आहे. नगर शहरापेक्षा शिर्डीत जास्त गुन्हेगारी असल्याचे सांगून काही दिवसापूर्वीच पाच-पाच, सहा-सहा खुनाचे आरोपी असलेले आणि मोक्कानुसार कारवाई झालेल्या लोकांच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत केल्याची सांगून त्याचे फोटो राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

या आरोपींचे कोणतेही सामाजिक योगदान नाही. कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी नाहीत. नगरसेवक नाहीत. मग यांचे कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा माजी खासदार विखे यांचा काय हेतू?, असा सवाल राजेंद्र पिपाडा यांनी केला. यातून शिर्डीत फक्त गुन्हेगारी आणि दहशतीचे राजकारण करण्याचा संदेश जात असल्याचेही राजेंद्र पिपाडा यांनी म्हटले. या सर्व कारणांमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शिर्डी मतदारसंघातून मंत्री विखे यांचा पराभव निश्चित दिसतोय. शिर्डीच्या जनतेमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. शिर्डीसह नगर जिल्ह्यातील विधानसभेचा सद्य परिस्थिती पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहे. पक्षश्रेष्ठींना शिर्डीच्या जागेसाठी पत्र व्यवहार केला असून पक्षश्रेष्ठींची प्रत्यक्ष लवकरच भेट घेणार असल्याचे भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT