Dhananjay Jadhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : चर्चा तर होणारच! संजय राऊतांचं भाजपच्या नेत्याला पत्र येतं तेव्हा...

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना नगरमधून प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पाठवलेले प्रसादाचे लाडू मिळाले आहेत. भाजपचे नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी हे लाडू पाठवले होते. हे प्रसादाचे लाडू मिळताच संजय राऊत यांनी देखील जाधव यांना पत्र पाठवले. खासदार राऊत यांचे भाजपचे धनंजय जाधव यांना आलेल्या या पत्राची चर्चा सुरू आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विखे कुटुंबियांकडून नगर जिल्ह्यात साखर आणि डाळ वाटप सुरू केले होते. तब्बल साडेसहा लाख शिधापत्रिका धारकांना ही साखर आणि डाळ वाटून प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रसाद म्हणून लाडू तयार करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून नगर जिल्ह्यात प्रसादाचे 21 लाख लाडू तयार झाल्याचा दावा खासदार विखे यांनी केला आहे. दरम्यान, खासदार विखे यांनी अयोध्येत जात प्रभू श्रीराम मूर्तीला नगर जिल्ह्यात बनवलेले प्रसादाचे लाडू अर्पण केले.

खासदार विखे यांच्या साखर आणि डाळ वाटपावर नगर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली होती. "खासदार विखे हे साखर आणि डाळ वाटून लोकांकडे मते मागत आहेत आणि लोक त्यांना मत देत आहेत. नगर जिल्ह्यातील राजकारण दोन-चार लोकांच्या हातात असून, बाकी सगळे गुलाम आणि लढत राहायचे, घोषणा देत राहायचे. हे कुठेतरी हे थांबवलाय पाहिजे", अशी टीका खासदार राऊत यांनी केली होती.

खासदार राऊत यांच्या या टीकेला भाजपचे नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी साखर आणि डाळ वाटपातून नगरकरांनी तयार केलेले प्रसादाचे लाडू पाठवून अनोख्यापद्धतीने उत्तर दिले होते. या लाडूंबरोबर पत्र पाठवत खासदार राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे म्हटले होते. खासदार राऊत यांना धनंजय जाधव यांचे पत्र मिळाले आहे. त्यानंतर आता धनंजय जाधवांनाही खासदार राऊतांचे पत्र आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आपण आगत्यपूर्वक पाठवलेला प्रसादाचा लाडू मिळाला. मी आपला आभारी आहे. प्रभू श्रीराम हे एकवचनी व सत्यवचनी होते. श्रीरामाच्या विचारांचा हा वारसा पुढे नेणे हा सुद्धा प्रसादच आहे. सर्वच क्षेत्रांतील सुज्ञ नागरिकांनी श्रीरामाचा हा आदर्श पाळावा व देशात रामराज्य निर्माण करावे, अशा माझ्या शुभेच्छा', असे खासदार राऊतांनी धनंजय जाधव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या या पत्राचीच नगर जिल्ह्यात चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT